नवी दिल्ली – राजस्थानमधील घडामोडींवरून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची संधी गेहलोत गमावतील, अशी शक्यता बळावली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या पदासाठी गेहलोत हे पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती ठरले. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे स्वत: गेहलोत यांनी जाहीरही केले. पण, राजस्थानमधील संकटामुळे पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. राजस्थान पेचाला जबाबदार नसल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न गेहलोत करत आहेत.
समर्थक आमदारांनी स्वत:हून भूमिका घेतली. माझ्या हातात काही नाही, असे गेहलोत यांनी पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांना सांगितल्याचे समजते. पण, गेहलोत यांच्या पाठिंब्याशिवाय आमदार एवढे राजकीय धाडस दाखवणार नाहीत, असे पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून गेहलोत यांचे नाव बाहेर पडू शकते. पक्षश्रेष्ठींकडून वेगळ्या नावांचा विचार केला जाऊ शकतो, असे अंदाज वर्तवले जात आहेत.