वर्धा : मागील काही दिवसांपासून कोंगीसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मात्र या चर्चांवर आता काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात, पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जे घोषणा कशा द्यायच्या, याची मूलभूत शिकवण देतात, ते पक्ष कसा सोडणार, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार, या निव्वळ वावड्या असल्याचे यावेळी म्हटले.
यवतमाळ येथून नागपूरला जात असताना वाटेत ते शेखर शेंडे यांच्या निवासस्थानी थांबले होते. वर्षाताई प्रमोद शेंडे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. चव्हाण पक्ष सोडणार असल्याची बाब त्यांनी सपशेल फेटाळली. मात्र, तुम्ही किंवा अन्य काँग्रेस नेत्यांबाबत अशी चर्चा का होत नाही, चव्हाणांबाबतच का, या प्रश्नावर त्यांनी स्मितहास्य देत अधिक भाष्य टाळले.
प्रदेश प्रतिनिधी म्हणून जी नावे जिल्ह्यातून गेली, त्यात नेत्यांचे सेवक, गणगोत, कंत्राटदार हे पण असल्याने असंतोष जाहीरपणे व्यक्त होत आहे. दलित, मुस्लीम, आदिवासी यांचा एकही प्रतिनिधी नसल्याने या घटकांत नाराजी असल्याचे निदर्शनास आणून दिले असता, थोरात यांनी, हा माझा विषय नाही. परंतु ही बाब गंभीर आहे, योग्य ठिकाणी मांडू, असे उत्तर दिले.