पिंपरी -शहराला आंद्रा धरणामधून पाणी मिळण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. या केंद्राचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र प्रशासनाने याला वीजजोडच दिला नाही. त्यामुळे काम पूर्ण होऊन देखील या ठिकाणाहून पाणी उचलता येणार नाही. याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. यावरून शहराला दररोज पाणी एप्रिल महिन्यामध्ये मिळेल का असे विचारले असता आयुक्त राजेश पाटील यांनी थेट हात वर करत मी याबाबत आताच काही सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना एप्रिल महिन्यामध्ये अतिरिक्त पाणी मिळून दररोज पाणीपुरवठा होईल की नाही याबाबत शंका उपस्थित झाली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यास सुरूवात केली आहे. निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. आंद्रा व भामा आसखेड पाणी योजनेचे काम संथगतीने सुरू आहे.
आंद्रा योजनेच्या माध्यमातून इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यासाठी निघोजे, तळवडे येथील अशुद्ध जलउपसा केंद्र उभारण्यात येत आहे. तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे व चिखली केंद्रांचे काम सुमारे 95 टक्के पूर्ण झाले आहे. हे काम सुरू असतानाच वीजपुरवठ्याचे काम करणे आवश्यक होते. मात्र अद्याप वीजपुरवठ्याचे काम सुरू करण्यात आले नाही. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना विचारले असता त्यांनी थेट हात वर करत मी याबाबत आत्ताच काही सांगू शकत नसल्याचे सांगितले.
यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये शहराला अतिरिक्त पाणी मिळून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. त्यानंतर सातत्याने तारीख बदलत नागरिकांना दररोज पाणीपुरवठ्यासाठी आशेला लावण्याचे काम प्रशासन करत होते. तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच आयुक्त पाटील यांनी एप्रिल महिन्यामध्ये नागरिकांना दररोज पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र आज पुन्हा मी याबाबत सांगू शकत नसल्याचे सांगितल्याने एप्रिल महिन्यात देखील दररोज पाणी मिळण्याची आशा धूसर झाली आहे.
आतापर्यंत हेल्पलाइनवर दीडशे तक्रारी
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. 24 मार्चपासून या हेल्पलाईनर 149 तक्रारी आल्या आहेत. या हेल्पलाईनचे काम सकाळी, दुपारी व रात्री अशा तीन शिफ्टमध्ये चालते. त्यामध्ये सकाळी 72 तक्रारी, दुपारी 65 तर रात्री 12 अशा 149 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या आहेत.