नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकांचे आता खासगीकरण होणार आहे. याचा सूचक इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. सरकारने सर्वच क्षेत्रात असण्याची गरज नाही असे वक्तव्य मोदींनी करत बँकांच्या खासगीकरणाच्या चर्चांना दुजोरा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिपम (DIPAM) विभागाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “सर्वच क्षेत्रात सरकारनं असण्याची गरज नाही. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही तर व्यवसायाला सहकार्य करणं ही सरकारची भूमिका आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर देशातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम या राष्ट्रीयकृत बँका करतात. जर या बँकांचे खासगीकरण केलं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहचणार असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाचा विषय हा मोदी सरकारच्या अजेंड्यावर आहे. या बँकांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘बॅड बँके’चा विषय काढला होता. त्यामुळे ज्या बँका तोट्यात चालल्या आहेत त्यांचे खासगीकरण होणार हे नक्की झालं होतं. आता पंतप्रधान मोदींच्या या ताज्या वक्तव्यानंतर देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण होणार याचे संकेत मिळताहेत.