Ajit Pawar : राजकारणात मोठी उलथापालथ होणार? अजित पवार महाविकास आघाडीत परतणार? ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
Ajit Pawar : अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीत परततील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
Updated On:

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीत (मविआ) परततील, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शनिवारी केला.
अजित पवार (Ajit Pawar)सध्या महायुतीत असले तरी त्यांचे मन अजूनही त्यांच्या कुटुंबासोबत आणि पर्यायाने शरद पवारांच्या सोबतच आहे, असे राऊत यांनी यावेळी नमूद केले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत ( Sanjay Raut )यांनी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य केले.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी घड्याळ या चिन्हावर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याकडे लक्ष वेधत राऊत म्हणाले की, दोन्ही गट आता तांत्रिकदृष्ट्या एकत्र आले आहेत.
अजित पवार दोन दगडांवर पाय ठेवून चालू शकत नाहीत, त्यांना शेवटी आपल्या मूळ प्रवाहात म्हणजेच महाविकास आघाडीत यावेच लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राऊत यांनी महायुतीमधील अंतर्गत कलहावरही बोट ठेवले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौरपदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये तणाव असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ८९ तर शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठला असला तरी महापौरपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दिल्लीतील भाजप नेतृत्व या पदाबाबत कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे राऊत म्हणाले.






