मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज शिवबंधन हातात बांधले आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक वरळीतून कोण लढणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
प्रवेशादरम्यान सचिन अहिर यांनी माध्यमांशी सवांद साधला होता. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. त्यांचे नवमहाराष्ट्र निर्माणाचे स्वप्न आपल्याला खूप आवडले असल्याचेही अहिर यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, राष्ट्रवादी सोडताना दुःख होत आहे. परंतु, काही वेळेस कठोर निर्णय घ्यावे लागतात, असं देखील अहिर यांनी म्हटलं आहे.