पुणे : पुणे शहरातील रखडलेले प्रकल्प तसेच शहराच्या विकासासाठी आवश्यक प्रकल्पांना राज्य शासनाच्या पातळीवर लवकरच गती मिळण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूतोवाच केले आहे.
“पुण्याच्या विकासाचा अजेंडा महायुतीने गेल्या अडीच वर्षांत सेट केला आहे. आता त्याला गती देण्याचे काम शासन करणार आहे,’ असे फडणवीस यांनी लोहगाव विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यामध्ये रिंगरोडसह, महापालिकेचे अनेक प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले असले, तरी रिंगरोड, शहरातील उड्डाणपूल, पीएमआरडीएचा विकास आरखडा, मेट्रोचे विस्तारित मार्ग, रस्त्यांचे रुंदीकरण, पुरंदर विमानतळ, खडकवासला-फुरसुंगी बंद कालवा प्रकल्प, शहरासाठी वाढीव पाणीसाठा असे अनेक विषय रखडलेले आहेत. त्यावर राज्य शासनाकडून निर्णय घेणे आवश्यक आहे.
मात्र, यातील प्रकल्पांबाबत शासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याने शहराच्या विकासाला त्याचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. यावर आता राज्य शासनाकडून कधी घोषणा केली जाते, याकडे पुणेकरांचे लक्ष आहे.