शिवसेना-भाजप युतीमध्ये कळीचा मुद्दा असलेली एक जागा म्हणजे औसा मतदारसंघ. हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत औसा येथून शिवसेनेचे दिनकर माने आमदार होते. त्यानंतर मात्र 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेना येथे पराभूत झाली. भाजपकडून गेल्यावेळी पाशा पटेल हे उमेदवार होते. पण कॉंग्रेसकडून त्यांचा पराभव झाला. आता भाजप अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देत जोरदार तयारी करत आहे.
औसा मतदारसंघाच्या बदल्यात भाजप शिवसेनेला उस्मानाबादमध्ये जागा वाढवून द्यायला तयार असल्याचं बोलले जात आहे. मात्र, शिवसेनेचा औसा येथे दावा आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासाठी एक जागा भाजपसाठी सोडली, तर सर्व जागा शिवसेनेला द्याव्यात हा पर्यायही युतीच्या चर्चेत आहे.
युतीची ही चर्चा फार ताणली गेली, तर भाजपचे इच्छुक उमेदवार अभिमन्यू पवार हे शिवसेनेतून लढतील असाही पर्याय चर्चेला आहे. दरम्यान, औसा हा भौगोलिकदृष्ट्या लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका. राजकीयदृष्ट्या कॉंग्रेस विचारसरणीचा हा परिसर असल्याचे बोलले जाते. पण, विकासाची कामे व्हायला हवी त्या प्रमाणात झाली नाहीत. सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूमचे मूळ रहिवासी बसवराज पाटील हे गेली दहा वर्षे औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या मतदारसंघातील 68 गावे ही निलंगा तालुक्यातील आहेत. या गावावर पालकमंत्री निलंगेकरांचे वर्चस्व आहे. भाजपमधील गटबाजीत ही गावे कोणाच्या पारड्यात मतदान करतात, यावरच अनेक गणिते अवलंबून आहेत.
या मतदारसंघात लिंगायत, मुस्लीम आणि मराठा समाजाची मते निर्णायक आहेत. लातूर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटरवर असूनही औसा शहराचा विकासच झाला नाही. आजही गावागावांत रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत प्रशासाठीच संघर्ष सुरू आहे. कोणताही मोठा उद्योग नाही. शैक्षणिक सोयीही पुरेशा नाहीत. या मतदारसंघातील दोन सहकारी आणि एक खासगी साखर कारखाना बुडाल्यात जमा आहे. या भागात पावसाचा रूसवादेखील कायम असतो. त्यामुळे सिंचनाचा कोणताही मोठा प्रकल्प या मतदारसंघात नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत येथील कौल कोणाला मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.