लोणी काळभोर -उरुळी देवाची (ता. हवेली) येथे पतीबरोबर होत असलेल्या सततच्या वादास कंटाळून वर्षापूर्वी माहेरी आलेल्या पत्नीचे कोणाबरोबर अनैतिक संबंध आहेत, असा संशय घेऊन कोयता व चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केला. खून करून पती फरार झाला आहे.
अर्चना ऊर्फ बबली भालचंद्र सुर्वे (वय 28, सध्या रा. अशोक नगर, ऊरूळी देवाची, ता. हवेली; मूळ रा. आचेगांव, जि. सोलापूर), असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी तिचे वडील दत्ता बागडे (सध्या रा. ऊरूळी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून भालचंद्र गिराप्पा सुर्वे (रा. आचेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अर्चना व भालचंद्र यांचा विवाह 2008मध्ये झाला होता. ती नांदण्यास गेल्यापासून पती-पत्नीमध्ये वाद होत असत. याला कंटाळून अर्चना दोन मुले साहिल (वय 10) व श्रावणी (वय 8) यांना घेऊन आई वडिलांकडे ऊरूळी देवाची येथे आली होती. खासगी कंपनीत काम करीत होती. आज रविवार सुट्टी असल्याने सर्वजण घरी होते. सकाळी तिचे आईवडील साहिल व श्रावणी यांना घेऊन खंडोबाचा माळ, ऊरूळी देवाची येथील चर्चमध्ये गेले होते. यावेळी अर्चना घरी एकटीच होती. शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सकाळी भालचंद्र सुर्वे तेथे आला व त्याने अर्चना भांडण केले. तिच्यावर धारदार कोयता व चाकू काढून सपासप वार केले. यात अर्चना जागीच मृत्युमुखी पडली. शेजारी जमा होत असल्याचे दिसताच भालचंद्र याने पळ काढला. ही माहिती ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे पोलिसांना मिळताच पोलीस पथक तेथे पोहोचले.