सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून केलं जातंय सहकार्य
वाई – पश्चिम महाराष्ट्रात ओढवलेल्या पुरपस्थितीत अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अनेकांचा यामध्ये बळी गेला आहे, घरे, ससांर उपयोगी साहित्य, व्यवसायिकांची दुकाने, शेतकऱ्यांचे पशुधन यांचे अपरिमित असे नुकसान झाले. या पुरग्रस्तांवर ओढवलेले डोंगराएवढे संकट दूर करण्यासाठी प्रत्येक सामाजिक संस्था, नागरीक प्रयत्न करताना दिसत आहेत. या जाणीवेतून कृष्णानदी काठावरच्या उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी कृष्णाकाठावरीलच नागरिक धावून आले व वाई शहरातील अनेक सामाजिक संस्था, दानशून व्यकतींनी मदतीचा हात पुढे केला.
पश्चिम महाराष्ट्रात गेली पंधरा दिवस पडत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व धरणे भरून मोठ्या प्रमाणावर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने वाई, सातारा, कराड, पाटणसह सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात अभूतपुर्व असे पुराचे संकट आले. यामध्ये नदीकाठच्या शहरातील नागरीवस्ती व ग्रामीण भागातील गावांना याचा मोठा फटका बसून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले.
या पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी वाई शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक, दानशून व्यक्ती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटीत होवून मोठ्या प्रमाणावर पुरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, यूमध्ये धान्य, पॅकींग खाऊ, पिण्याचे पाणी, कपडे, किराणा माल, औषधे, मेडिकल टिम इत्यादी मोठ्या प्रमाणावर गोळा करून तीन टेम्पो साहित्य एका दिवसात गोळा केले असून प्रातांधिकारी संगीता चौगुले, तहसिलदार रणजित भोसले, पालिकेच्या मुख्याध्याधिकारी विद्या पोळ व प्रशासनाच्या निर्देशानुसार योग्य ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे.
सामाजिक संस्थामध्ये मानवता सोशल ग्रुप, मैत्री फाऊंडेशन, महसूल विभाग, वाई रोटरी कलब वाई, उत्कर्ष पतसंस्था, वाई जिमखाना, मेडिकल असोसिएशन वाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट वाई, आर्ट ऑफ लिव्हींग, आस्था सामाजिक संस्था, द्वारकाआळी मित्र समुह, गंगापुरी-नावेचीवाडी ग्रामस्थ, भटकंती सह्याद्री ग्रुप यांच्यासह अनेक सामाजिक संस्था दानशून व्यक्तींनी मदत केली असून मदतीचा ओघ अजून ही चालू आहे.