कात्रज- पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे तुडुंब भरलेली असतानाही दक्षिण पुण्यातील पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद करण्यात येत आहे. या निर्णयामुळे नागरिकांची अडचण होत आहे. यामुळे पाणीकपात त्वरित रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महापौर तथा नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी आयुक्तांकडे केली आहे. पाणी कपात रद्द केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिकेत भाजपची सत्ता आणि त्यांच्या कारभारामुळे दक्षिण पुण्यातील नागरिकांना पावसाळ्यातही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण पुण्यामध्ये बालाजीनगर, पुण्याईनगर, राजीव गांधीनगर, सुखसागरनगर, धनकवडी, कात्रज परिसरांत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद असतो. परंतु शहरातील इतर भागांत आठवड्यातील सातही दिवस, तर पेठांमधे दररोज 10 ते 12 तास पाणीपुरवठा सुरळीत होत आहे.
मग याच भागावर अन्याय का किंवा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित केला. करोनाचे संकट आणि आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद हा दुजाभाव यामुळे दक्षिण पुण्यातील नागरिकांना दुहेरी संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी धनकवडे यांनी यावेळी केली.