जगदिश देशमुख
कष्टाने कमावलेला, घामाच्या धारा वाहून मिळवलेला पैसा आपण बॅंकेत ठेवतो, एका फ्रॉड कॉलनंतर तो आपल्या बॅंक अकाऊंटमधून अचानक गायब होतो तेव्हा मनाला प्रचंड वेदना होतात, पण थोडा सावधपणा दाखवला तर ह्या मनाच्या वेदना आपण दूर करू शकतो.
पैसा कधीच कुणाला विनासायास मिळत नाही, त्यासाठी काहीना काही द्यावेच लागते. मग तो तुमचा वेळ असेल, कष्ट असतील, बुद्धिचातुर्य असेल. जेव्हा आपल्याला एक फोनकॉल येतो तेव्हा तो वेगळ्या नंबरवरून येतो आणि त्या फोनवर कधी घाबरवले जाते, कधी धमकी दिली जाते, कधी व्यावसायिक भाषेत विचारले जाते. तुमच्या एटीएमची मुदत संपली आहे तुमचा एटीएम काही वेळात बंद होईल. असा आपल्याला कॉल येतो. एटीएम हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याने आपण जास्त विचार न करता कॉल केलेल्या व्यक्तीला सगळे बॅंक डिटेल्स, सगळी माहिती पटापट सांगून टाकतो आणि वरती धन्यवादही म्हणतो आणि थोड्या वेळातच आपल्या फोनवर अमुक अमुक रक्कम डेबिटेड असा मेसेज येतो. तेव्हा आपल्याला समजते आपण फसलो. आपण फसलो असल्याने आपण त्याबाबत नातेवाईक, मित्रपरिवार यांना काहीच सांगत नाही. ही फसवणूक फक्त गरीब, अशिक्षित, शेतकरी यांची होते असे नाही तर यामध्ये उच्चशिक्षित, डॉक्टर, वकील यांचा अधिक समावेश आहे.
आपली फसवणूक होण्याची कारणे समजून घेऊ या.
1) घाईगडबडीत फोन उचलून समोरची व्यक्ती कोण बोलते याकडे लक्ष न देता त्याला पाहिजे ती माहिती देणे.
2) अनोळखी व्यक्तीला नाही कसे म्हणू, त्याला काय वाटेल अशी वाटणारी खंत.
3) बॅंकेतून फोन केला आहे असे वाटणे.
4) बॅंक कधीही अशा प्रकारची खातेदाराची माहिती घेत नाही हे माहिती नसणे.
आपल्याला आधी हे समजून घ्यावे लागेल की, बॅंक किंवा कस्टमर केअरलाही खातेदारांना फोन करून खातेदाराची बॅंक डिटेल मागविण्याचा अधिकार नाही. समजा तुमच्या एटीएमची मुदत संपणार असेल तर त्यावेळी आधीच बॅंकेतून तुम्हाला पत्र किंवा मेल केला जातो. त्यानंतर खातेदारांनी बॅंकेत जाऊन त्यासंदर्भात माहिती घ्यायची असते; परंतु फोनवर अशा प्रकारे कुठलीही माहिती बॅंक घेत नाही.
आता आपण फसगत होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे ते पाहू या.
1) अनोळखी व्यक्तीने बॅंक डिटेल्स विचारल्यास त्याला माहिती देऊ नका.
2) परत परत फोन आल्यास पोलिसात तक्रार करावी.
3) अनोळखी व्यक्तीने पाठवलेली मोबाइल लिंक ओपन करू नका त्या लगेच डिलिट करा.
4) बॅंकेचे खाते, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जपून ठेवा.
5) त्यांचा ओटीपी नंबर सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी लिहून ठेवू नका.
6) लॉटरी, बक्षीस, लागल्याचे ई-मेल, कॉल, मेसेज आल्यास त्याला बळी पडू नका.
7) एटीएम सेंटरमध्ये छुपा कॅमेरा बसवला नाही ना याची खात्री करा.
8) एटीएमचा पीन क्रमांक टाकताना कोणासही दिसणार नाही, याची काळजी घ्या,
9) एटीएममधून पैसे निघाले नाही तर त्वरित बॅंकेस कळवा.
10) क्रेडिट कार्ड व बॅंक स्टेटमेंट यांची नेहमी पडताळणी करा.
11) एटीएम कार्डद्वारे फसवणूक झाल्यास तत्काळ बॅंकेशी संपर्क साधून कार्ड बंद करून सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधा.
कारण ती लॉटरी किंवा बक्षीस हे तुम्हाला नसून तुम्ही माहिती दिल्यास कॉल करणाऱ्याला नक्की लागणारी असते. हे लक्षात ठेवा. खातेदारांची केवळ फ्रॉड कॉलद्वारेच फसवणूक होते असे नाही. खातेदारांची अनेक मार्गाने पिळवणूक सुरूच आहे. बॅंकेचे कर्मचारीही ग्राहकांची फसवणूक करत आहेत. बॅंकांकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज देण्यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल घेऊन सरकारने बॅंक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. 2015 ते 2017 या काळात झालेल्या व्यवहारांसंदर्भात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नोटाबंदीच्या काळाचाही समावेश आहे.
रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये 4 हजार 641, 2016 मध्ये 3 हजार 232 आणि 2017 मध्येही बॅंक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यांमध्ये सुमारे 95 हजार 760 कोटी रुपयांचे बॅंक गैरव्यवहार समोर आले आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या काळात 5 हजार 743 प्रकरणे समोर आली आहेत. बॅंक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने एकूण 3.38 लाख बॅंक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच ही माहिती दिलीय. ऑनलाइन हॅकर नावाची जमात तर पाचवीला पूजलेली आहेच. ह्या जमातीचे एक बरे आहे ते सर्वसामान्य ग्राहकांना डायरेक्ट त्रास देत नाही, ते बॅंकेला लुबाडतात आणि ह्यांची फसवणूक लाखोत नसते करोडोत असते. मात्र, शेवटी अप्रत्यक्षरीत्या त्याचा बोजाही सर्वसामान्य ग्राहकांवर येतोच.
फ्रॉड कॉल, बॅंक कर्मचाऱ्यांची फसवणूक, बॅंक बंद पडणे, ऑनलाइन हॅकर्स ह्यांनी कितीही फसवणूक केली तरी त्यांना ह्या गुन्ह्याबद्दल शिक्षा काहीच नाही. आतापर्यंत कुठल्या फ्रॉड कॉलवाल्याला पकडून शिक्षा दिली आहे, कुठला हॅकर पोलीस यंत्रणेच्या हाती लागला आहे, कोणीच नाही. खातेदारांचे मात्र पैसे पुन्हा मिळत नाही. या व्यवस्थांचा थोडा का होईना मागोवा घेतला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे तरच टिकाव लागेल नाहीतर कष्टाने कमावलेला पैसा हा असाच आपल्यापेक्षा सावध चतुर माणसांच्या, व्यवस्थेच्या हातात जात राहील.