बुलंदशहर -उत्तर प्रदेशात आम्ही रोजगार देण्याचा विचार मतदारांपुढे ठेवतो कारण त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण या राज्यातील निवडणूक प्रचारात गरमी आणि चरबीची भाषा बोलली जाऊ लागली आहे. ही भाषा अनुचित असून राजकीय पक्षांनी मतदारांशी निगडीत मुद्द्यांवर प्रचार केला पाहिजे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केले आहे.
पश्चिमी उत्तर प्रदेशातील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलिया, मलिया, जमालिया आणि बजरंगबली यांचा उल्लेख करीत जे विधान केले आहे त्याचाही प्रियंकांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक प्रचाराच्या काळात अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत. या प्रचार काळात लोकांना जे प्रत्यक्ष सोसावे लागत आहे त्यावर टिकाटिप्पणी व्हायला हवी आहे. येथील लोकांच्या समस्या अत्यंत कठीण आहेत. लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात येथील लोकांची हलाकी वाढली आहे. ती कमी करण्यासाठी केले जाऊ शकते यावर राजकीय नेत्यांनी भाष्य केले पाहिजे, ते सोडून हे लोक गरमी आणि चरबीची भाषा बोलू लागले आहेत. अशी भाषा ते कशी करू शकतात हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. भाजप नेत्यांकडून विरोधकांची गरमी आणि चरबी कमी करण्याची भाषा केली गेली आहे त्यावर प्रियंका यांनी हे भाष्य केले आहे.
प्रियंका-अखिलेश आमने-सामने
राजकीय नेत्यांकडून रोड शो काढण्यात येत असून गुरुवारी अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आमने-सामने आले. दोन्ही नेत्यांचे रोड-शो एकाच वेळी पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकमेकाला नमस्कर केला. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी ट्विटरलाही हा क्षण शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंका गांधी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याकडे हास्यमुद्रेने नमस्कार करताना दिसत आहे. एकमेकांसमोर आल्याचा फोटो ट्विट करत अखिलेश यांनी, “एक दुआ-सलाम ब तहज़ीब के नाम’ या कॅप्शनसहीत पोस्ट केला. या ट्विटला प्रियंका गांधी यांनीही उत्तर देत “तुम्हालाही आमच्याकडून राम-राम’ असे म्हटले आहे.