गुजरातच्या राजकोटमध्ये दुर्घटना घडली आहे. करोनाच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच जणांचा त्यात मृत्यू झाला. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असताना त्यांचा मृत्यू झाला. काय दक्षता घेतली ते दिसतेच आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत गुजरातमध्ये अशीच दुर्घटना घडली होती. त्यावेळीही काही लोक प्राणास मुकले. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटना घडल्या. रुग्णालयात माणूस प्राण वाचवण्यासाठी जातो. आपल्याकडे लवकर प्राणमुक्त होण्याची व्यवस्था केली की काय, असा प्रश्न पडावा इतकी ही भयावह स्थिती आहे.
या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली. त्यावर भाष्य करताना न्यायालयाने करोनाचा उल्लेख केला. 80 टक्के लोक उघड्या तोंडाने फिरत आहेत. उर्वरित 20 टक्के लोकांच्या हनुवटीवर काहीतरी लटकल्यासारखे दिसते. बिनधास्त कार्यक्रम सुरू आहेत. लोक एकत्र येत गर्दी करत आहेत. याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले आणि कानउघाडणी केली. अगदी नेमक्या आणि थेट शब्दांत हे भाष्य आहे. त्याचे स्वागत. मात्र आता आठ महिने झाल्यावरही असे भाष्य करावे लागण्याची आवश्यकता आहे का, हा त्यावरचा प्रश्न. प्रश्न न्यायालयाला नाही. तो सरकारलाही नाही. तो सर्वसामान्यांना आहे.
सरकार काही देव चालवत नाही. तीही माणसे आहेत. आपल्यातूनच निवडून गेली आहेत. आपल्याला ज्या अडचणी आणि समस्या आहेत त्या त्यांनाही आहेत. फक्त आपल्यापेक्षा थोडी वेगळी माहिती त्यांना अगोदर मिळते हाच काय तो फरक. मात्र त्या माहितीच्या आधारावर त्यांनी नेटके नियोजन करणे अपेक्षित असते. त्यामुळे संकटाची दाहकता किंचितशी कमी होते. करोनाची पहिली लाट आली त्यावेळी कोणाला फारशी माहिती नव्हती. जगातल्या बातम्या वाचल्या आणि फॉरवर्ड केल्या गेल्या.
युरोपातले विशेषत: इटलीतले कथित व्हिडिओही फॉरवर्ड झाले. चीनचे वुहानही त्यात दिसले. याचा अर्थ करोनाचे गांभीर्य समजले होते. त्याला थोपवायचे कसे याचीही बऱ्यापैकी कल्पना आली होती. पण बऱ्याचदा मोठ्या संकटाचा सामना करताना अगदी फुटकळ आणि क्षुल्लक बाबीकडे दुर्लक्ष होते. त्याचे मूल्यही चुकवावे लागते. काय खावे येथपासून वाफ घेण्यापर्यंत आणि “दो गज दूरी’पर्यंत सगळे झाले. मात्र या विषाणूची मुळात आयातच होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली नाही. जगभरातली हवाई वाहतूक बंद झाली असताना आपल्याकडे ती सुरूच होती.
पुण्याचा प्रकार तर फारच भीषण. सांगितलेले सगळे उपाय केले गेले. पण दुबईहून येणाऱ्या विमानांचा यादीत समावेश नसल्यामुळे ते उतरवले गेले. करोनाचा पुण्यात शिरकाव झाला. असो. झाला प्रकार आणि चुका आता उगाळण्यात काही अर्थ नाही. अनुभव उत्तम शिक्षक असतो असे म्हणतात. करोना नवीन होता, तेव्हा बेसावध राहिलो. मात्र आता दुसरी लाट येणार असल्याचे गेल्या महिनाभरापासून सांगितले जात आहे. तरीही आपण मतिमंदासारखे का वागत आहोत, याचा लोकांनी विचार केलेला बरा. मास्क घालण्यात काय अडचण आहे, हा प्रश्न अगोदर आरशात पाहून स्वत:लाच विचारावा. आज कोणत्याही रस्त्यावर आणि बाजारातील दुकानात गेले तरी भीतीचा लवलेश नाही.
पहिल्या वेळा लॉकडाऊन झाले. तेव्हा अज्ञान होते. लॉकडाऊन केल्याने करोना घरात येणार नाही असा ढोबळ हिशेब. तो काही अंशी बरोबरही ठरला. मात्र करोनाला बाहेर ठेवण्याच्या नादात मंदीला सगळा देश मोकळा केला गेला. करोनावर लस सापडली आहे. तो आज आहे, उद्या नसेल. मात्र त्याला थोपवण्यात जी मंदी आपण आमंत्रित केली ती किमान दशकभर तरी आपल्याला उठू देणार नाही. असे असताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची भाषा सुरू झाली आहे. सोशल मीडिया बहाद्दरांचे एकवेळ ठीक. त्यांना असेही काही काम असत नाही. गेल्या 72 तासांपासून पुन्हा लॉकडाऊनचे मेसेज फिरत आहेत. त्यात मंत्र्यांनी भर घातली. पूर्वी फक्त जागतिक आरोग्य संघटनेचे पदाधिकारीच करोनाबाबत निगेटिव्ह बोलायचे.
करोना इतक्यात संपणार नाही वगैरे बोलून धीर देण्यापेक्षा भीतीच घालायचे. यावेळी भारतातले व विशेषत: महाराष्ट्रातले नेते दुसरी लाट आणि लॉकडाऊनची भीती घालताना दिसले. त्यामुळे सोशल मीडियावाल्यांना नाही म्हटले तरी थोडा चेवच आला. पंजाब आणि गुजरातच्या काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. काही बंधने पुन्हा आणण्यात आली आहे. एकाने केले म्हणून दुसऱ्याने करायचे असा प्रकार आता सुरू झाला आहे. मुख्यमंत्री अथवा मंत्रिमंडळ चर्चा करते. निर्णय घेतात आणि लॉक केले जाते. त्यातही करोनाचा प्रसार रात्रीतूनच होतो असा कोणीतरी त्यांचा समज करून दिलेला दिसतो. कारण रात्रीची संचारबंदी जारी करण्याचे अतर्क्य निर्णय घेतले जात आहेत. करोना आणि रात्र यांचा परस्परसंबंध किमान आरोग्य संघटनेने तरी अद्याप सांगितलेला नाही.
रात्रीतून संसर्ग वाढतो असेही कुठे म्हटलेले नाही. मात्र आपल्याकडे निर्णय घेताना रात्रीपासून सुरुवात केली जाते. दिवसा सगळेच बिनबोभाट. मास्क नाही अन् सुरक्षित अंतरही. आताही करोनामुळे लॉकडाऊनचीच भीती अधिक गडद का केली जाते आहे त्याचे लॉजिक समजत नाही. मार्च एप्रिलमध्ये होती तशी अनिश्चितता आता नाही. किमान तीन लशी तयार झाल्या आहेत. त्या आज न उद्या मिळतीलच. ज्याला घाबरून जगावे लागत होते, त्याचे औषध मिळाले आहे. ते हातात पडायचाच काय तो अवधी राहिला आहे. मात्र तरीही तोपर्यंत बेफिकीरीला तिलांजली द्यावी लागणार आहे.
मास्कचा वापर करूनच आपण सगळे व्यवहार सुरळीत ठेवू शकतो. ते सुरळीत राहिले तरच भविष्य आहे. अन्यथा पंजाब आणि गुजरातने केले म्हणून आपण करायचे असा निर्णय घ्यायला सगळेच सज्ज आहेत व तोच अत्यंत धोकादायक आणि अव्यवहार्य तोडगा आहे. तसे होऊ द्यायचे नसेल तर न्यायालयाच्या टिप्पणीची प्रत्येक वेळी वाट पाहत बसायचे काही कारण नाही. अन लॉकडाऊनलाही घाबरायचे कारण नाही. रुग्णालयातील बेड कमी पडू लागले तर आणि तरच लॉकडाऊनचा दंडुका पुन्हा बसेल. बेड भरू न देणे कोणाच्या हातात आहे?