नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाला (एनआरसी) विरोध दर्शवण्यासाठी देशभरातील 70 हून अधिक विद्यार्थी आणि युवक संघटना एका छताखाली एकवटल्या आहेत. त्या संघटनांनी निदर्शनांची तीव्रता आणखी वाढवण्याचे सूतोवाच केले आहे.
विद्यार्थी आणि युवक संघटनांनी एकत्र येऊन नॅशनल यंग इंडिया को-ऑर्डिनेशन अँड कॅम्पेन या संघटनेची स्थापना केली आहे. नव्या संघटनेच्या सदस्यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. पुढील महिन्यात होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाआधी (26 जानेवारी) का मागे घेण्याची मागणी संघटनेने केली.
नववर्ष दिनी संघटनेचे सदस्य राज्यघटना वाचवण्याची शपथ घेणार आहेत. नववर्षाचा संकल्प-राज्यघटनेचे रक्षण अशा आशयाची घोषणाही संघटनेने निश्चित केली आहे. का आणि एनआरसीला विरोध करणाऱ्या निदर्शकांमध्ये समन्वय ठेवण्याच्या उद्देशातून संबंधित संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षता यांच्या पाठिशी कायम उभे राहण्याचा संदेश आम्हाला केंद्र सरकारपर्यंत पोहचवायचा आहे. का आणि एनआरसी मागे घेईपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, असा निर्धार नव्या संघटनेकडून व्यक्त करण्यात आला.