नवी दिल्ली – प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) म्हणजेच सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले. त्या कृतीमुळे भारत-चीनमधील करारांचा भंग झाला. त्यातून द्विपक्षीय संबंधांचे मोठे नुकसान झाले. सीमेवर एवढे सैन्य जमवण्याबाबत चीनने आतापर्यंत भारताला पाच वेगवेगळी कारणे दिली, असे परखड प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी बुधवारी केले.
चीनी कुरापतींमुळे सात-आठ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये सीमेलगत तणावाची स्थिती आहे. त्याबाबत एका ऑनलाईन परिसंवादात जयशंकर यांनी भाष्य केले. भारत आणि चीनमधील चांगल्या संबंधांसाठी सीमेवर शांतता अबाधित राहणे आवश्यक आहे.
मात्र, सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशांमधील संबंध मागील 30 ते 40 वर्षांतील सर्वांत अवघड वळणावर आहेत. आता ते संबंध सुरळित कसे करायचे हा खूप मोठा मुद्दा आहे, असे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला.
त्या घटनेमुळे राष्ट्रीय भावना पूर्णपणे बदलल्याचेही जयशंकर यांनी नमूद केले. सीमेवरील तणाव संपवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळ्यांवर चर्चेच्या विविध फेऱ्या झाल्या. मात्र, सैन्यमाघारीबाबत दिलेला शब्द चीन पाळत नसल्याने तणाव संपुष्टात येऊ शकलेला नाही.