नवी दिल्ली – करोनामुळे देशात बाधित झालेल्यांची संख्या मोठी आहे, तद्वतच उपचार करून करोनामुक्त झालेल्यांची संख्याही मोठी आहे. मात्र तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू कशामुळे झाले असा सवालही विचारला जात आहे. त्यावर सरकारने खुलासा केला आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार अन्य देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर तसा कमीच आहे. मात्र उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सरकारने म्हटले आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार जगभरात करोनामुळे दर दहा लाख लोकसंख्येमागे 216 लोक मरण पावले आहेत. मात्र भारतात हेच प्रमाण दहा लाखांमागे केवळ 106 एवढे आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर हा मृत्यूदर अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य विभागाने केलेल्या विश्लेषणानंतर रूग्ण अगदी गंभीर अवस्थेत पोहोचल्यावर इस्पितळात दाखल होतात. बऱ्याचदा अशा वेळी वेळ निघून गेली असती. वेळेवरच जर रूग्णालयाची वाट धरली तर मृत्यूदर आणखी कमी केला जाउ शकतो.
करोनाची लागण होण्याचे प्रमाणही भारतात लक्षणीयरित्या कमी आहे. दहा लाखांमागे जगात लागण होणाऱ्यांची संख्या 9600 एवढी आहे, तर भारतात तेच प्रमाण 7300 पर्यंत खाली आले आहे.