बंगळूर – कर्नाटक सरकार अडचणीत आले असले तरी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मी राजीनामा का देऊ? त्याची आता काय आवश्यकता आहे, असा उलट सवाल त्यांनी गुरूवारी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केला.
कर्नाटक सरकार अल्पमतात आल्याचा दावा करत भाजपने बुधवारी कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याशिवाय, राजकीय पेचामुळे कुमारस्वामी राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यापार्श्वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांनी कर्नाटकात भाजपची सत्ता असताना 2009-10 मध्ये घडलेल्या घटनेचीही आठवण करून दिली. त्यावेळी काही मंत्र्यांसह 18 आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना विरोध केला होता.
मात्र, येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, काही आमदारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या पेचावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्या चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही.