मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करून आठ दिवस झाले तरी अजून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला नाहीये. अशातच बंडखोर आमदारांना दणका देत उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केले आहेत. बंडखोर आमदारांकडे असलेली खाती काढून घेऊन इतरांना देण्यात आली आहेत.
परिवाराने धोका दिला तरी मित्रपक्ष खंबीर
या नव्या खतवाटपात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगली संधी मिळाली असून विशेष करून राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळातील वर्चस्व वाढले आहे. याचबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘परिवारानं धोका दिला असला तरी मित्रपक्ष खंबीर होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने पहिल्यापासून आम्हाला साथ दिली आहे. शरद पवार यांनी पहिल्यापासूनच मुख्यमंत्र्यांना विश्वास दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आदित्य एका कार्यक्रमासाठी मुंबईतील वरळीमध्ये आले होते. वरळी हा ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पुढे बोलताना ते म्हणाले , ‘राज्यात अनेक कामं सध्या खोळंबली आहेत, त्यामुळे हे खातेवाटप गरजेचं होतं, असा दावा त्यांनी केला.
नवे खातेवाटप
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम खाती सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे. गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे देण्यात आले आहे. दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडे देण्यात आले आहे, रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे. उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
शिवसेनेकडील खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नव्याने केलेल्या खातेवाटपानुसार शिवसेनेकडील ही खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. यापैकी राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांना तर काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना ही खाती देण्यात आली आहेत.
१)राष्ट्रवादी
— शंभूराज देसाई यांच्याकडील गृह ग्रामीण खातं राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
–अन्न व औषध प्रशासन तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना सांस्कृतिक खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
–शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेल्या बच्च कडू यांच्या खात्यांचा कारभार हा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आले आहेत. (शालेय शिक्षण)
–राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांना इतर मागास बहुजन कल्याण खाते देण्यात आला आहे.
–वैद्यकीय शिक्षण आणि वस्त्रोद्योग खाते प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आले आहे.
२) काँग्रेस
— काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांच्यावर वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता खात्याची जबाबदारी असेल.
— काँग्रेसच्याच सतेज उर्फ बंटी पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार मिळाला आहे.