मुंबई : नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीने राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सत्यजित तांबे यांनी केलेल्या बंडाने या निवडणुकीला वेगळाच रंग चढला होता. दरम्यान, या निवडणुकीवर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्यजित तांबे प्रकरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
याविषयी बोलताना अशोक चव्हाण यांनी,’नाशिक विधानपरिषदेची जागा काँग्रेसची होती. काँग्रेसच्या चिन्हावर दोनवेळा सुधीर तांबे दोनवेळा निवडून आले होते. विधानपरिषदेचे गटनेते होते. त्यामुळे काँग्रेसने दिलेली उमेदवारी सुधीर तांबेंनी नाकारणं हे उचित झाले नाही. सत्यजीत तांबेंना उमेदवारी देण्यास कोणाचाही विरोधी नव्हता. पण, सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची माहिती नाही, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान अशोक चव्हाण यांनी,“नाशिकची जागा पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडून आली असती. मात्र, सत्यजीत तांबेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. याने काँग्रेसचं काही प्रमाणत नुकसान झालं आहे. तसेच, सत्यजीत तांबेंनी अपक्ष राहणार म्हणून भूमिका जाहीर केली आहे.”
“मी बाळासाहेब थोरातांचं कौतुक करतो. त्यांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हा त्यांना म्हणालो, बाळासाहेब तुम्ही काम करता त्याचंही कौतुक करता आणि जो करत नाही त्याचंही कौतुक करता. तुमच्या जीभेवर साखर आहे. ही बाळासाहेब थोरात यांची खासियत आहे. नाना पटोलेंचं तसेच आहे. नाना पटोले एकदम भडकतात. नंतर म्हणतात चूक झाली, जाऊदे. पण, माझं मत आहे की, दोघेही आपल्या परीने काम करतात,” असे अशोक चव्हाणांनी सांगितले.