साउदम्पटन – इंग्लंडमध्ये या काळात पावसाळी हवामानच असते हे माहीत असतानाही आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येथे का आयोजित केला, अशा शब्दांत जागतिक स्तरावरील माजी क्रिकेटपटूंनी आपला संताप व्यक्त केला आहे.
भारत व न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे आता अनिर्णित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. खरेतर या सामन्याचा निकाल लागणे अत्यंत आवश्यक होते. कोणत्याही स्पर्धेचा अंतिम सामना जर निकाली झाला नाही तर त्यातील गंमतच निघून जाते.
हा सामना अन्यत्र आयोजित करता आला असता किंवा अन्य देशातही घेता आला असता. मात्र, इंग्लंडमध्ये हा सामना घेण्याचा अट्टहास आयसीसीने का केला हाच मोठा प्रश्न आहे, अशा शब्दांत भारताचा माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण व संजय बांगर, इंग्लंडचा माजी कसोटीपटू केवीन पीटरसन, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू शेन बॉण्ड यांनी आयसीसीवर आपला संताप व्यक्त केला आहे.