जामखेड – खरीप हंगामाचा पीकविमा भरते वेळी आम्ही सर्व कागदपत्रे विमा कंपनीला दिले आहे. परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. परंतु पीकविमा कंपनी मात्र कागदपत्र भरून घेत आहे.आमचे सर्व कागदपत्र कंपनीकडे असताना पुन्हा कशाला कागदी घोडे नाचवतात. विमा कंपनी शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा संतप्त आरोप शेतकऱ्यांतून केला जात आहे.
एकीकडे परतीच्या पावसाने सर्वच पिकांची वाट लागली आहे. खरिपाचे पूर्ण पीक हातची गेली असल्याने शेतकरी आता रब्बीच्या पेरणीची तयार करत असताना पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.
यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याअभावी पिके जळणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पीकविमा भरल्यास नुकसान भरपाई मिळेल. या आशेने अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करुन पिकविमा भरला होता. पीकविमा ऑनलाईन भरण्यासाठी महासेवा केंद्रावर गर्दी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रात्री- बेरात्री थांबून आपल्या विमा भरला होता. आता परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
पावती लागते कशासाठी
नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात असतानाही विमा कंपनी मात्र शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. खरिपाचा पीकविमा भरताना शेतकऱ्यांनी सातबारा, पासबूक, आधार कार्डसह अन्य कागदपत्र दिलेली आहेत. तरीही कंपनीचे अधिकारी सर्व कागदपत्रे तसेच विमा भरल्याची पावती मागत आहे. अनेक शेतकऱ्यांना पावत्या सापडत नसल्याने अडचणीचे ठरत असल्याचे विष्णूपंत राऊत यांनी सांगितले.