नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे व्यक्त केली खंत
पिंपरी – भारतामध्ये दाखल होणाऱ्या करोना विषाणूबाबत पालिका प्रशासन इतके उदासीन का आहे? असा थेट सवाल भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांना केला आहे.
नगरसेवक वाघेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना विषाणू अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. याबाबत एक फेब्रुवारी रोजी देखील ही बाब निदर्शनास आणून दिली होती. या जीवघेण्या आजारामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाबही निदर्शनास आणून दिली होती. तसेच आपल्या पिंपरी चिंचवड उद्योगनगरीमध्ये असंख्य नागरिक बाहेरून दाखल होत असतात, त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये नवीन करोना विषाणू रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करण्याची तसेच आरोग्य व वैद्यकीय विभागामार्फत या विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित राबविण्याची विनंती देखील केली होती, परंतु आपल्या प्रशासनाच्या वतीने दहा दिवस होऊनही कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत.
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास 22 लाखांच्या घरात आहे. या विषाणूचा फैलाव जर या शहरामध्ये झाला तर हाहाकार माजेल, या रोगावर नियंत्रण मिळवणे अशक्य होणार आहे. आपल्याकडे तेवढी सक्षम यंत्रणा देखील नाही आणि जरी सक्षम यंत्रणा असली तरी तरी आपल्या प्रशासनाची तेवढी मानसिकता नक्कीच नाही हे गेल्या दहा दिवसात कोणतीही कारवाई केली नसल्याने दिसून येत आहे. गेल्याच महिन्यात बैठकीसाठी केवळ दोन डॉक्टर उपस्थित होते, हे देखील निदर्शनास आणून दिले होते. त्यावर देखील तुम्ही कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.
महापालिकेची जवळपास 27 रुग्णालये आहेत, त्याच्या कक्षामध्ये परिसरातील इतरही खाजगी रुग्णालये आहेत. महापालिकेतील किती अधिकाऱ्यानी रुग्णालयाची पाहणी करून करोना विषाणू संबंधित उपचार केले जातील याची माहिती महापालिकेकडे उपलब्ध आहे का? असा सवाल या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. तसेच आयुक्तांनी स्वतः वायसीएमला किती वेळा भेट दिली, असाही खोचक प्रश्न वाघेरे यांनी विचारला.