मुंबई – सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. सोमवारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात अर्थसंकल्पातील तरतुदीवरून टीका टीप्पणी झाली. मात्र आज अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर गदारोळ झाला. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.
मनसूख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब समोर आला आहे. मनसूख हिरेन यांची जी गाडी स्फोटकांसाठी वापरण्यात आली ती गाडी नोव्हेंबरपासून ५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, हे मनसूख यांच्या पत्नीने सांगितलं. मनसूख यांचा तपास केवळ सचिन वाझे यांनी केला. दररोज तीन दिवस आपले पती सचिन वाझेसोबत जात होते. मला पोलिस त्रास देतात हे मनसूख हिरेन यांचं पत्र देखील सचिन वाझे यांनीच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवायला लावल्याचं हिरेण यांच्या पत्नीने सांगितलं आहे. तसेच पतीला दोन दिवस अटक होण्यास सचिन वाझे यांनीच सांगितल होतं. माझे पती हिरेन यांचा खून सचिन वाझे यांनीच केला असा आरोप त्यांच्या पत्नीच्या बयाणात असल्याचं फडणवीसांना सांगितलं.
दरम्यान पुरावे असताना सचिन वाझे क्राईम इंटेलिजन्स युनिट, मुंबईचे प्रमुख आहे. या पदावर असताना वाझे यांना पुरावे नष्ट करण्याची संधी आहे. त्यांना या पदावर ठेवून चौकशी होऊ शकत नाही. त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. मात्र सचिन वाझे यांना अटक केल्यास अनेकांची नावं बाहेर येऊ शकतात. गृहमंत्र्यांनी कबूल केलं होत की, वाझेंना हटवू, मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर सचिन वाझेंना हटविण्याचा निर्णय बदलण्यात आला. सरकार वाझेंना पाठिशी का घालत आहे. स्फोटकं प्रकरण हे सरकार स्पॉन्सर होत का, असा सवाल उपस्थित करत संपूर्ण प्रकरणात सरकार उघड पडल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.