नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची तब्बल 54 तास चौकशी करण्यात आली. मात्र श्रीलंकेतील उर्जा प्रकल्पाच्या प्रकरणात ईडी गप्प आहे. या प्रकल्पाचे काम उद्योगपती गौतम अदानी याच्या सूमहाला मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोन कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केला आहे. अदानींना ठेके देण्यासाठीच मोदी पंतप्रधान झाले आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
गौरव वल्लभ म्हणाले की गेल्या दोन आठवड्यांत राहुल गांधी यांची लगोपाठ 54 तास चौकशी केली गेली आहे. मात्र मी एक गंभीर प्रकरण आपल्यासमोर ठेवतो आहे. या प्रकरणात ईडीने मौन साधले आहे. ते का गप्प आहेत हा आमचा प्रश्न आहे. श्रीलंकेतील पवन ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहाला देण्यात यावे यासाठी नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्यावर दबाव आणल्याची माहिती त्या देशातील सीलोन इलेक्ट्रीसिटी बोर्डाचे अध्यक्ष एमएमएम फर्डिनेंडो यांनी त्या देशाच्या संसदेत दिली आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान एका खासगी उद्योजकाला ठेका देण्यासाठी पंतप्रधान झाले आहेत का, असा सवाल वल्लभ यांनी केला. भारतासारख्या महान राष्ट्राचे पंतप्रधान एका खासगी कंपनीचे एजंट झाले आहेत का, ईडी आणि अन्य तपास संस्थांना याची चौकशी करणे योग्य वाटले नाही का, एका व्यक्तीचा फायदा करून द्यावा असे पंतप्रधानांना का वाटते, त्या व्यक्तीचे एजंट म्हणून काम करून पंतप्रधान देशाची प्रतिष्ठा कमी करत नाहीत का, पंतप्रधानांची काही मजबुरी आहे का असे सवाल वल्लभ यांनी विचारले आहेत. तसेच तपास संस्था झोपा काढत आहेत का अशी टीकाही त्यांनी केली.