नवी दिल्ली – अर्णब गोस्वामी या पत्रकाराने आपल्या टीव्ही चॅनेलवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पालघर हत्या प्रकरणात थेट जबाबदार धरून जी व्यक्तिगत पातळीवर अश्लाघ्य टीका केली ती पत्रकारीतेच्या सर्व मर्यादा भंग करणारी होती. पण त्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का मौन पाळले आहे, असा सवाल कॉंग्रेस पक्षाने त्यांना उद्देशून केला आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की, एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला अध्यक्षांवर अशा स्वरूपाची टीका आणि अशा स्वरूपाची पत्रकारिता त्यांना मान्य आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात ते आजपर्यंत तरी काही बोलताना दिसले नाहीत किंवा त्यांनी त्यावर कारस्थानी स्वरूपाचे मौन बाळगले आहे.अशा प्रसंगात पंतप्रधानांनी राजकीय मतभेदातून बाहेर येऊन अशा स्वरूपाची पत्रकारितेचा निषेध नोंदवला पाहिजे. पण ते हा निषेध का नोंदवत नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे. या टीव्ही पत्रकाराशी मोदींशी असलेली दोस्ती जगजाहींर आहे. या पत्रकाराच्या समर्थनार्थ भाजपचे नेते ज्या पद्धतीने उतरले आहेत तेही निषेधार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे. यातून भाजपची सवंग मानसिकताच लक्षात आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, पालघरमध्ये जेथे ही घटना घडली तो भाग हा भाजपचे वर्चस्व असलेला भाग आहे आणि जे 101 हल्लेखोर पकडण्यात आले आहेत त्यात कोणीही मुस्लीम आरोपी नाहीत, असे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही घटना धार्मिक विद्वेषातून झालेली नाहीं असे स्पष्ट होते. पत्रकारांनी आणि प्रसिद्धी माध्यमांनी स्वत:हून संयमाच्या लक्ष्मण रेषेचे पालन केले पाहिजे अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय टीका करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे पण ही टीका विधायक आणि वास्तववादी असली पाहिजे पण टीका करण्याच्या नादात व्यक्तिगत द्वेष प्रकटकरणे योग्य नाही. त्यातून धार्मिक विद्वेषालाच चालना दिली जात आहे, असे ते म्हणाले. करोनाच्या काळात अशी दूषित पत्रकारिता कशी चालवू दिली जाते, असा सवालही वेणुगोपाल यांनी पंतप्रधानांना केला.