मुंबई – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंद पुकारला. यावरून विरोधकांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लखीमपूर येथील घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गप्प का, यावरही त्यांनी खुलासा केला.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला ढोंगीपणाचा कळस असल्याचं म्हटलं. तसंच त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.
लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाने आंदोलकांना गाडी खाली चिरडलं. यावरून पंतप्रधान मोदी आणि शाह गप्प का, असा सवाल देशभरातून उपस्थित करण्यात येतोय.
त्यावर फडणवीस म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जर काँग्रेस नेत्यांचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसेल तर त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं करत राहावीत. मोदींनी शेतकरी सन्मान योजनेसारखी योजना आणली. यातूनच त्यांची शेतकऱ्यांप्रती संवेदना दिसून येते, असंही फडणवीस म्हणाले.