मुंबई – मंदिरे सुरू करायची असतील तर कशाप्रकारची रचना पाहिजे त्याच्यावर चर्चा करता येईल, तुम्ही पुढे या, आम्ही शासनाला सांगू… एकत्र बसून ठरवू. परंतु मंदिरे उघडलीच पाहिजे अशाप्रकारचा हट्ट का? इतर लोक येवून चर्चा करतात तर तुम्हाला चर्चा करायला अडचण का वाटते? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले यांनी भाजपला केला आहे.
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने तुळजापूर आणि पंढरपूर येथे मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर माजी आमदार हेमंत टकले यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. मंदिरे, धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत.
मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे धार्मिक अधिष्ठान असलेले वेगवेगळे समुह आहेत. परंतु याचा राजकारणाशी जोडण्याचा काय संबंध…असा मुद्दा उपस्थित करत जेव्हा एखाद्या राज्यातील प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असते. त्यामुळे उगाचच अशाप्रकारची आंदोलने करून काय मिळते असा सवालही हेमंत टकले यांनी भाजपला केला आहे.
थिएटर, मॉल सुरू केले आणि बाजारातही गर्दी दिसते आहे, मग मंदिरांनीच काय केले असा सवाल भाजप करत आहे. परंतु मंदिरात येणारा भाविक असतो त्याची अडवणूक करणं कुणालाही जमणार नाही, असे सांगतानाच आज आर्थिक संकट मोठं आहे… लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत… कारखानदारी बंद पडली आहे… ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था नाहीत.
अशावेळेला अशाप्रकारचा हट्ट धरणं औचित्याला धरुन नाही. त्यामुळे संबंधित पक्षाच्या नेतृत्वाने फेरविचार करावा अशी मागणीही हेमंत टकले यांनी केली आहे.
परमेश्वर जसा तुमचा आहे तसा तो सगळ्यांचा आहे. श्रध्दा सगळ्यांचीच परंतु असं ओंगळ प्रदर्शन करण्याची गरज नाही, असे सांगतानाच त्यावर मार्ग शोधला पाहिजे, समजुतीने घेतले पाहिजे. सरकार यावर नक्कीच मार्ग काढणार आहे याबद्दल खात्री बाळगा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.