मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांमागे ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप वगळता इतर पक्षातील अनेक नेत्यांना ईडीची नोटीस मिळत असल्याची ओरड राजकीय नेत्यांकडून करण्यात येते. त्यात आता काँग्रेस नेत्याने एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची चौकशी का होत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
जातीयवादी आणि लोकशाहीविरोधी धोरणांना विरोध केल्यानंतर भाजपकडून देशद्रोही ठरविण्यात येते. तर कधी संबंधीत नेत्यामागे ईडी किंवा सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावण्यात येतो. मात्र ईडी किंवा सीबीआयची नोटीस एमआयएम किंवा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यामागे का लागत नाही, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला. मुंबईतील काँग्रेसनेते शिवकुमार लाड यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गायकवाड बोलत होते.
ईडी किंवा सीबीआयची नोटीस एमआयएम किंवा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यामागे लागत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, या पक्षांचा भाजपला फायदा होतो. हे पक्ष काँग्रेसची मतं घेतात. त्यामुळे भाजपचा विजय होतो. तर निवडून आल्यावर भाजपकडून द्वेष आणि जातीवाद पसरविण्यात येत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.
गायकवाड यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. संविधानामुळे आपण पंतप्रधान झाल्याचे मोदी सांगतात, मात्र कधीही भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत नाही. याउलट संविधानविरोधी काम करत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.