दसरा अर्थात विजयादशमी म्हणजे विजयाचा उत्सव. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात झेंडूच्या फुलांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. झेंडूची फुलं घरोघरी सजावटीसाठी, पूजेसाठी आणली जातात. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचाच वापर होतो. दसरा सणाला झेंडूच्या फुलांना इतकं महत्त्व का? जाणून घेऊयात.
* दसऱ्याला झेंडूची फुलं वापरण्याचे कारण म्हणजे या दिवसांत झेंडू सहजपणे उपलब्ध असणे आहे. आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुलं सुंदरच दिसतात. या रंगामुळे ते सोनेरी असल्याचे जाणवतं. पिवळा, केशरी किंवा सोनेरी रंग आपल्याकडे शुभ मानले गेले आहे. झेंडूच्या फुलांचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतं.
* या फुलाचं धार्मिक महत्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे म्हणून विजयाच्या सणासाठी झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुलं वापरण्याचं महत्त्व आहे.
* या फुलाला ‘हिरण्यगर्भपुष्प’ देखील म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू.
* झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. साधरण दोन ते तीन दिवसही फुले कोमेजत नाही.
* एकाच रंगामध्ये विविध छटा, लहान-मोठे, टोकदार-पसरट पाकळ्यांचे आकार आकर्षण वाढवतात.
* इंग्रजीत ‘मेरीगोल्ड’ नावानं ओळखले जाणारे झेंडूचे फुल सूर्याचे प्रतीक असल्याचे म्हटलं जातं. प्राचीन ग्रंथाप्रमाणे हे फुल सुंदरता आणि ऊर्जेचं प्रतीक आहे.
* याला संस्कृतमध्ये स्थूल पुष्प या नावाने ओळखतात. हे दिव्य शक्तींसह सत्याचे प्रतीक मानले गेले आहे.