नवी दिल्ली : उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सवर विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान, हे प्रकरण चर्चेत असतानाच आता पुन्हा एकदा तीरथ सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रावत यांनी “कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?” असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. धान्यासाठी अधिक मुलं जन्माला घालण्याच्या विधानाने आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
#WATCH हर घर में पर यूनिट 5 किलो राशन दिया गया।10 थे तो 50 किलो, 20 थे तो क्विंटल राशन दिया। फिर भी जलन होने लगी कि 2 वालों को 10 किलो और 20 वालों को क्विंटल मिला। इसमें जलन कैसी? जब समय था तो आपने 2 ही पैदा किए 20 क्यों नहीं पैदा किए: उत्तराखंड CM मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत pic.twitter.com/cjh2hH5VKh
— ANI_HindiNews (@AHindinews) March 21, 2021
नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्य वाटपाविषयी बोलताना तीर्थ सिंह रावत यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. “कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य 5 किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात 10 सदस्य आहेत त्यांना 50 किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं” असे रावत यांनी म्हटले आहे.
“मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण 20 मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल” असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले आहे.
एका हिंदी संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत” असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. यानंतर सर्वांनी यावरून निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. महिला नेत्यांनी यावरून निशाणा साधत टीकास्त्र सोडलं आहे. मात्र टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.