वाघोली – पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येचे सर्वात जास्त असणारे गाव म्हणून वाघोली ची ओळख आहे. वाघोली चा नुकताच पुणे महानगर पालिकेत समावेश झाला आहे.महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये राजकीय उलाढाल मोठ्याप्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे.
सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना आगामी काळात वाघोली साठी भरीव निधी आणण्यासाठी व काम करण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे या संधीचे सोने करण्यासाठी वाघोली परिसर पुणे शहरातील इतर मतदारसंघाला जोडला जाऊ शकतो आणि वाघोली चा नगरसेवक कोण या चर्चेने अनेक राजकीय मंडळींनी आपल्या जुन्या नव्या मित्रांना भेटीगाठी देण्याचे व राजकीय वजन वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
वाघोली मधील दोन गटांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एकाकडे सरपंच पदाची तर दुसऱ्याकडे उपसरपंच पदाची धुरा होती मात्र शेवटच्या टप्प्यात एकाच गटाकडे दोन्ही पदे राहिल्याने वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते.
यानंतरच्या काळात अनेक जुन्या-नव्या राजकीय मंडळी मधील सुप्त वाद उफाळून आल्याने गट तट तथा काट शह चे राजकारण वाघोलीत पहावयास मिळू लागले आहे. पुणे शहरा लगतचा परिसर असल्याने शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट , वडगावशेरी चे आमदार सुनील टिंगरे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या संपर्कात वाघोली मधील अनेक राजकीय मंडळी येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
याशिवाय अनेक कार्यक्रमांना सध्या या सर्व मंडळींचा समावेश असल्याच्या कार्यक्रम पत्रिका सध्या पाहावयास मिळत आहे. वाघोली मधील नगरसेवक किंवा वाघोली इतर पुणे शहराच्या भागाला जोडल्यानंतर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून नेतेमंडळी शी संपर्क ठेवून राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न आणि विकास कामांच्या माध्यमातून लोकाभिमुख बनण्याचा आग्रह धरत अनेक मंडळी काम करताना दिसू लागली आहे.
यात काहींनी वाघोली चा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट केल्याबद्दल तर वाघोलीच्या समस्या सोडविण्याबाबत कोणती भूमिका घेणार याबाबतचे बॅनर द्वारे शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये देखील सध्या या सहा लोकप्रतिनिधींचे वेगवेगळ्या कामांसाठी फोन येऊ लागले आहेत. शिवाय विविध बैठकांना देखील वाघोलीतील नेते आता हजर राहू लागले आहेत. आगामी काळात नगरसेवक या पदाचा बहु मान मिळवण्यासाठी गेल्या पाच दिवसात झालेली उलाढालही लक्षवेधी ठरू लागली आहे.