नवी दिल्ली: भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनानंतर तरुण वयातील आणि फिट दिसणाऱ्या तरुणांना हार्टअटॅकचा बळी का व्हावे लागते असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये भारतात तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे असेही या निमित्ताने समोर आले आहे.
चाळिशीच्या आसपास तंदुरुस्त शरीर आणि सुखी जीवन हे सर्व असूनही सिद्धार्थ शुक्ला हृदयविकाराचा बळी ठरला म्हणजेच वरून तंदुरुस्त दिसणारे शरीर आतून तेवढे तंदुरुस्त नसते का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. भारतात हृदयविकाराचे जेवढे बळी ठरतात त्यापैकी 50 टक्के बळी 50 वर्षांपेक्षा आतील वयातील लोकांचे असतात अशीही आकडेवारी यानिमित्ताने समोर आली आहे.
जगातील इतर सर्व देशांचा विचार करता भारतात हृदय विकाराचा धक्का आठ ते दहा वर्ष आधीच बसतो असे आकडेवारी सांगते हृदय विकारामुळे दरवर्षी जगात एक कोटी 70 लाख लोकांचा बळी जातो त्यापैकी तीस लाख लोक हे भारतातील असतात 40 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धक्का येण्याचे प्रमाण तब्बल 25 टक्के आहे. 2000 ते 2016 या कालावधीमध्ये तरुणांना हृदयविकाराचा धक्का बसण्याच्या प्रमाणात दरवर्षी दोन टक्के वाढ होताना दिसत आहे.
साधारणपणे हृदयविकाराचा धक्का बसण्यापूर्वी काही लक्षणे त्याच्या आधी काही दिवस दिसत असतात पण तरुणांना ज्या हृदय विकाराचा सामना करावा लागत आहे त्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आधी दिसत नाहीत आणि अचानकच हार्ट अटॅक येऊन त्यांना जीव गमवावा लागत आहे. 26 ते 44 या वयोगटातील तरुणांना याचा धोका वाढण्याचे महत्त्वाचे कारण तंबाखूसेवन हेच आहे.
20 टक्के युवक फक्त तंबाखू सेवनामुळे हृदयविकाराचा सामना करत आहेत. भारतात सात कोटी पेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण असल्याने त्यामध्ये तरुणांचे प्रमाणही जास्त आहे आणि हृदयविकार वाढण्याचे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. जीवनशैलीत बदल करून युवा पिढी हृदयविकारापासून दूर राहू शकते असा तज्ञांचा सल्ला आहे. दररोज व्यायाम करणे योग्य आहार घेणे आणि पुरेशा प्रमाणात झोप घेणे हे साधे उपाय जरी वापरले तरी तरुण वर्ग हृदयविकारापासून दूर राहू शकेल असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे.