चमोली (उत्तराखंड)- उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात नंदादेवी हिमकडा उर्जा प्रकल्पाजवळ कोसळल्याने धौली गंगा नदीला पूर आला आहे. तपोवन भागातील रैनी गावात ही दूर्घटना घडली. हा हीमकडा कोसळल्याने नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यानंतर आजूबाजूची शेकडो घरे पाण्यात अक्षरश: वाहून गेली. ऋषीगंगा प्रकल्पावर काम करणारे सुमारे दीडशे मजूर बेपत्ता आहेत. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मोदी सरकारवर मुद्यावर निशाणा साधत ‘देवभूमीतील हाहाकार. प्रकल्पांचे प्रहार थांबवा!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामानाचा अग्रलेख ?
एकीकडे हिमालयाला देशाचे कपाळ म्हणायचे , उत्तराखंडला देवभूमी म्हणून संबोधायचे आणि दुसरीकडे दानव बनून त्याच देवभूमीच्या कपाळावर अहोरात्र खोदकाम करून जीवघेणे प्रकल्प उभे करायचे याला काय म्हणावे ? देवभूमीत जो हाहाकार झाला ती नैसर्गिक आपत्ती नव्हतीच . आपणच आपल्या हाताने पायावर मारलेली ती कुऱ्हाड आहे . केवळ हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करून देवभूमीचे रक्षण होणार नाही . त्यासाठी देवभूमीवरील प्रकल्पांचे प्रहार थांबवावे लागतील , अन्यथा भविष्यातील पिढय़ांना यापेक्षाही मोठे हाहाकार बघावे लागतील !
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी मराठीत एक म्हण आहे. पुढे चालणारी व्यक्ती ठेच लागून धडपडल्यानंतर त्याच्या मागून येणाऱ्या व्यक्तीने सावध व्हावे हा या म्हणीचा सरळ अर्थ. तथापि, पुढचाच माणूस वारंवार ठेचाळत असेल तर त्याला काय म्हणावे? उत्तराखंडमध्ये नेमके हेच घडले आहे. सात वर्षांपूर्वी केदारनाथ तीर्थक्षेत्राच्या परिसरात जो भयंकर प्रलय आला आणि त्याने जो विध्वंस घडविला त्यापासून आपण काहीही बोध घेतला नाही किंवा शहाणे झालो नाही हेच देवभूमीतील ताज्या प्रलयाने सिद्ध केले आहे. हिमालय पर्वताच्या कुशीत विसावलेल्या उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात रविवारी हिमकडा किंवा हिमनदीचा पृष्ठभाग कोसळून धौलीगंगा नदीला संहारक म्हणावा असा महापूर आला. शासन, प्रशासन, जनता यापैकी कोणालाही काही कळण्याच्या आत सुमारे दहा किलोमीटरच्या परिसरात या जलप्रलयाने अक्षरशः हाहाकार उडवला. ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा धरण याचे अतोनात नुकसान झाले. खास करून ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तपोवन आणि ऋषीगंगा या दोन प्रकल्पांवरील शेकडो कामगार अचानक आलेल्या जलप्रलयात वाहून गेले. नदीकाठच्या गावांतील अनेक लोकांना जलसमाधी मिळाली. हजारो कोटींचा खर्च करून उभारण्यात येत असलेले दोन ऊर्जा प्रकल्प क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. तपोवन जलविद्युत प्रकल्पाचे धरण फुटले. याच प्रकल्पातील बोगद्यात शेकडो मजूर काम करत होते.