नवी दिल्ली – गुजरातमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा देशावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे गुजरातमध्ये तीन वेळा मुख्यमंत्री का बदलण्यात आले हा प्रश्न गुजरातच्या जनतेने विचारला पाहिजे, असे मत कॉंग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले की, या निवडणुकीत गुजरातच्या जनतेला आम्ही व्याख्यान देणार नाही. ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे व येथील लोक समजदार आहेत. भगवान श्रीरामांचाही वनवास 14 वर्षांत संपला होता. त्यामुळेच देशाच्या राजकारणात नवी सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मी गुजरातच्या जनतेला करतो.
ते पुढे म्हणाले, तुम्ही 27 वर्षे एका पक्षाला संधी दिली. त्याचे परिणाम तुमच्या समोर आहेत. गुजरात मॉडेलचे वास्तव तुमच्यापेक्षा जास्त कोणी सांगू शकणार नाही. मोरबीच्या घटनेने गुजरातचे नाव खराब झाले असून लोकांनी याचा विचार करायला हवा. नरेंद्र मोदी जसे देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी गुजरात सोडले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्यानंतर राज्यात तीन मुख्यमंत्री झाले.
अगोदर आनंदीबेन पटेल झाल्या. त्यांची काय अडचण होती? काही समस्या होती तर त्यांची निवड का करण्यात आली. त्यांच्या जागेवर विजय रूपानी यांना आणण्यात आले. त्यांचे काही चुकीचे होते का? आता त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना आणण्यात आले. हा घटनात्मक पदाचा अपमान आहे.
भाजप रोजगार, वेतन, महागाई याबाबत बोलत नाही. कोणी बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींची प्रशंसा करतो तेव्हा समाजात त्याचा काय संदेश जातो असा सवाल त्यांनी केला.