नवी दिल्ली: भारतीय हद्दीमध्ये चिनी सैन्याने अजिबात घुसखोरी केलेली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज जोरदार टीका केली. गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहिद झाले, त्याबद्दल पंतप्रधानांनी चीनला क्लीन चीट दिली का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चिदंबरम यांनी ट्विटरवरून पंतप्रधानांना 15 जूनच्या घटनेबाबत 5 प्रश्न विचारले आहेत. त्यातील एका प्रश्नामध्ये “जर 16-17 मे रोजी कोणत्याही विदेशी व्यक्तींचा सहभाग नव्हता, तर गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष का झाला.’ असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे.
भारतीय हद्दीमध्ये कोणीही चिनी सैनिक नाहीत, असे जर पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर 5 मे रोजी काय झाले होते ? 16-17 मे रोजी संघर्ष कोणामध्ये झाला ? आणि 20 जवान शहिद कसे झाले ? या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत, असे चिदंबरम यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
जर कोणतीही घुसखोरी झालेली नाही, तर तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान चर्चा का केली गेली ? असाही प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे. प्रत्यक्ष ताबारेषेवर काही तणावच नव्हता, तर ही चर्चा कशासाठी केली गेली. कॉर्प्स कमांडर्सनी 6 जून रोजी एकमेकांशी चर्चा कशासाठी केली. ही चर्चा काय केवळ हवापाण्यासंदर्भात होती का ? असे चिदंबरम म्हणाले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी “परिस्थिती जैसे थे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’ असे निवेदन प्रसिद्ध का केले. पंतप्रधानांनी चीनला क्लीन चीट दिली आहे का? जर तसे असेल, तर चीनबरोबर चर्चा करण्याचा हेतू तरी काय? अशी प्रश्नांची सरबत्ती चिदंबरम यांनी केली आहे.