नवी दिल्ली – देशातील करोनाची स्थिती खूपच वाईट असून पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा केंद्र सरकारने मंगळवारी दिला. गेल्या 24 तासांत भारतात 97 हजार नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ करोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
यापूर्वी, सप्टेंबर 2020 मध्ये देशात सर्वाधिक 97 हजार कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आली होती. यानंतर काही महिने रुग्ण संख्या कमी दिसली असली तरी आता मात्र रुग्ण संख्येचा आलेख पुन्हा वाढला असून एप्रिल महिना हा कोरोनाच्या संसर्गाबाबत अधिक धोक्याचा असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे,
हा आलेख पुन्हा कसा काय वेगाने वाढला असा प्रश्न सध्या सर्वसामन्यांमध्ये चर्चेत आला आहे. यांची काही मुख्य करणे केंद्र सरकारने घेतल्या चर्चेत पुढे आली आहे.
– कोरोनाला गांभीर्याने नं घेणं. म्हणजेच, वारंवार हात धुणं, सुरक्षित अंतर पाळणं आणि मास्क घालणं हे नियम पाळणं लोकांनी सोडून दिलं. बाजार, मॉल्स आणि हॉटेल्समधील गर्दी वाढायला लागली.
– लोक दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या अशा साथीच्या रोगाने इतके कंटाळले आहेत की ते त्यापासून बचावासाठीचे नियम पाळण्याऐवजी सामान्यरित्या जीवन जगू लागतात.
– कोरोनाबाधितांच्या निकटसहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण सर्व राज्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता आहे.
– अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा डबल म्युटेंट आढळला आहे. हा म्युटेंट झालेला विषाणू संसर्ग वेगाने पसरवतो.
– लसीकरणाचा वेग देखील संसर्ग वाढण्याचे एक कारण आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण वेगाने होण्याची गरज आहे.
दरम्यान, देशात नवे रूग्णवाढीचा आकडा आता पुन्हा एकदा 1 लाखाच्या घरात जाउन पोहोचला आहे. किंबहुना गेल्या वर्षी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एकाच दिवसात जेवढे रूग्ण सापडले नव्हते, तेवढे आता सापडत आहेत. जागतिक मंचावर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सोमवारी भारतात एकाच दिवसात करोनाचे 1,03,844 नवीन रुग्ण वाढले आहेत. रूग्णवाढीच्या या संख्येमुळे भारताने ब्राझीलचा रेकॉर्ड मोडला आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची एकूण संख्या 31,420,331 आहे. तर 5,68,777 मृत्यूची नोंद आहे.