नवी दिल्ली – चीनने पूर्व लडाखमधील हॉटस्प्रिंग, गोग्रा आणि देसपांग या भागातील आपले सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला घेरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीनशी चर्चा करून भारताने वेळ वाया घालवला आहे हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. लष्कर माघारीची भारताने चीनशी चर्चा केली होती.
ती चर्चा का अपयशी ठरली याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. चीनने गोग्रा, हॉटसिंप्रग, देसपांग येथील लष्कर माघारी न घेण्याने देशाच्या हिताला व सुरक्षेला थेट धोका निर्माण झाला आहे. भारत चीन थेट चर्चेतून भारताच्या पदरात यापेक्षा अधिक चांगले काही तरी पडायला हवे होते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
त्या आधी याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्तेअजय माकन म्हणाले की, चीनने या प्रदेशातून माघार घेण्यास नकार दिल्याची बाब उघड झाल्यानंतर सरकारने त्यावर खुलासा केला पाहिजे. भारत आणि चीन या देशांमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या लष्करी चर्चेतूनही भारतासाठी अनुकूल असे काहीही घडलेले नाही. या संबंधात केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मिळालेच पाहिजे, अशी मागणीही कॉंग्रेसने केली आहे.