मुंबई – राज्यात करोनाचा धोका कमी होत असताना अचानक ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण मिळत आहे. त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. चिंताजनक बाब अशी की राज्यात लस घेऊनही डेल्टा प्लसच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, राज्यात करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराचे आजवर एकूण 66 रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात डेल्टा प्लसचे रुग्ण पहायला मिळाले आहेत. यामध्ये जळगावला 13, रत्नागिरी 12, मुंबई 11, ठाणे 6, पुणे 6, पालघर 3. रायगड 3, नांदेड 2, गोदिंया 2, आणि चंद्रपूर, अकोला, सिंधूदूर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबात, कोल्हापूर व बीड याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आहे. असे एकूण डेल्टा प्लसचे 66 रुग्ण राज्यात आहे.
यामध्ये दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 10 जणांना पुन्हा करोनाच्या डेल्टा प्लसची लागण झाली आहे. 66 पैकी 8 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशा एकूण 18 लोकांनी लस घेतल्यानंतरी लागण झाली आहे. यामध्ये दोन जणांनी कोव्हाक्सिन घेतली आहे तर 16 जणांनी कोव्हिशिल्ड घेतली आहे.
66 पैकी एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांचा मृत्यू डेल्टा प्लसनेच झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण त्यांना इतर व्याधीही होत्या तसेच 62 वर्षापेक्षा त्यांचे वय होते. त्यामुळे यांचा मृत्यू फक्त डेल्टा प्लसमुळे झाला असं म्हणता येणार ऩाही. असे राजेश टोपे यांनी माहिती देताना सांगितले आहे.