मुंबई – छोट्या – लो बजेट चित्रपटांचा मसिहा म्हणून ओळखला जाणारा राजकुमार राव सध्या काहीसा शांत शांत आहे. आयुष्मान खुरानाची लोकप्रियता आणि कार्तिक आर्यनची तरुणांमध्ये वाढती क्रेझ यांमुळे राजकुमारच्या यशाच्या गाडीला स्पीडब्रेकर लागला आहे.
तथापि, राजकुमार म्हणतो की, अभिनयाच्या क्षेत्रात ही गोष्ट नवी नाही. मेड इन इंडिया, शिमला मिर्ची यांसारख्या चित्रपटांच्या अपयशानंतर माध्यमांसाठीही तो एक चर्चेचा आणि अभ्यासाचा विषय बनला आहे. पण लोक हे कसे विसरून जातात की आम्हा कलाकारांसाठी चित्रपटांमध्ये बरीच कामे आहेत.
आज माझेच उदाहरण घेतले तर मी अर्धाडझन चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. माझे रुही अफ्जा, चॅलेंज, लुडो हे चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे आयुष्मान असेल, कार्तिक असेल किंवा मी असेन; आम्हाला कामाची कमतरता नाही. त्याचबरोबर मिळालेल्या कामात आम्ही 100 टक्के झोकून देत असतो. अर्थात एक गोष्ट खरी आहे की, आपल्याकडे हिट चित्रपटांची चर्चा स्वतंत्रपणे होते आणि त्या आधारावर आमचा तुलनात्मक अभ्यास केला जातो.
ही गोष्ट मला खटकणारी आहे. सुरुवातीच्या काळात लव सेक्स धोका, रागिनी एमएमएस या चित्रपटांनी मला स्टारडम मिळवून दिलं. पण त्याच वेळी माझ्यासोबत कोणी प्रस्थापित नायिका काम करण्यास तयार नाहीये, अशाही बातम्या माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या. पण त्यानंतरही ऐश्वर्या राय, सोनम कपूर, हेमा मालिनी, जान्हवी कपूर, नुसरत भरुचा यांच्यासोबत काम केले. त्यावेळी मला लक्षात आले की, निर्माते-दिग्दर्शकांच्याच अशा प्रकारच्या अटी असतात.