मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे काय झाले? वर्षे उलटले तरी या प्रकरणावर सीबीआयचे मौन का? तपास कुठपर्यंत आला? असे प्रश्न उपस्थित करतानाच या प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजपने माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सचिन सावंत यांनी ट्विटवर ट्विट करून भाजप आणि सीबीआयवर प्रश्नांचा भडिमार केला आहे. सीबीआयने बिहार पोलिसांकडून सुशांतसिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेण्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. बिहार पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 177 कलमाचे उल्लंघन केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते.
परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरता वापर केला गेला. भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला, अशी टीका सावंत यांनी केली आहे.
आघाडी सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनिती आखून भाजप संचलित वाहिन्यांना सुशांतसिंहचा खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत होते. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार केले व त्या माध्यमातून अपप्रचार केला.
राजकीय अजेंड्यासाठी वापर
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी सुशांतसिंहच्या मृत्यूच्या केलेल्या तपासाच्या चेष्टेतून मोदी सरकारकडून या यंत्रणांचा राजकीय अजेंड्यासाठी कसा वापर केला जात आहे हे स्पष्ट होते. एम्स पॅनेलने सुशांतसिंहच्या हत्येला नकार देऊनही 300 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. याप्रकरणी अजूनही सीबीआय मुद्दाम मौन बाळगून आहे, त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? हे सीबीआयने तत्काळ स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.