रवींद्र कदम
मनपा प्रभाग सहाची निवडणूक होणार प्रतिष्ठेची : भाजप मित्र पक्षाला देणार का साथ?
नगर – महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 “अ’ मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप-सेनेत सरळ लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महाविकास आघाडीत बिघाड करणार का? भाजप मित्र पक्षाला साथ देणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिप्रतिष्ठेची होणार आहे. दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून, ही निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार आहे.
महापालिकेच्या प्रभाग 6 “अ’ मधील शिवसेना नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. निवडणूक आयोगाकडून रिक्त जागेवर पुन्हा पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे. अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
मागील निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार सारिका भुतकर यांना निवडणूकीत 3 हजार 780 मते मिळाली होती.
भाजपच्या उमेदवार आरती बुगे यांना 3 हजार 307 मते तर राष्ट्रवादीच्या उमेदवार मंदा गंभिरे यांना 1 हजार 53 मते मिळाली होते. यात मतांची आकडेवारी पाहता शिवसेना व भाजपातच चुरशीची लढत झाली. मात्र, आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाची महाआघाडी झाल्याने राष्ट्रवादीने प्रभाग सहा “अ’ मध्ये उमेदवार दिला नाही. की सेनेला शह देण्यासाठी महापालिकेच्या भाजप मित्र पक्षाला सहकार्य करून आघाडीत बिघाड करणार असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याच प्रभागात पोटनिवडणूक होणार असल्याने या निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार की, मनपातील भाजप-राष्ट्रवादीची युती या निवडणुकीतही कायम राहणार, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडून अनिता लक्ष्मण दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. व भाजपकडून वर्षा रोहन सानप व पल्लवी दत्तात्रय जाधव असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते.
मात्र, त्यातील वर्षा रोहन सानप यांचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला आहे. 24 जानेवारी अर्ज माघारीची मुदत असल्याने शुक्रवारी चित्र स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे प्रभाग सहा अ मधील निवडणूक अतिप्रतिष्ठेची बनली असून तीनही पक्षाचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी,दि. 24 अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या दिवशी शिवसेनेच्या अनिता दळवी व भाजपच्या पल्लवी जाधव यांनी अर्ज माघारी न घेतल्यास सरळ लढत होणार आहे.
दरम्यान, महापालिका पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मतदारयादीत नाव नसल्याच्या कारणावरून बाद केला आहे. यानिर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वर्षा रोहन सानप यांनी सांगितले. महापालिकेने अंतिम मतदारयादी 11 जानेवारीला प्रसिध्द केली आहे. त्यापूर्वी 8 जानेवारीला वर्षा सानप यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट झालेले आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे सानप यांनी म्हटले आहे. याबाबत औरंगाबाद खंडपीठातही दाद मागितली असून तेथील निर्णय प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
असे झाले तर पुन्हा कारवाई होणार का?
महापालिका निवडणूकीत सेनेचे जास्त उमेदवार निवडणून येवून ही शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही. कारण राष्ट्रवादीने भाजप पक्षाला बहुमत दिल्याने भाजपला बहुमत नसतांनाही महापौरपद भाजपच्या पदरात पडले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षाच्या विरोधात काम केल्याने पदाधिकाऱ्यांनाही काही काळ पदावरून रिक्त व्हावे लागले. त्यामुळे पुन्हा या पोटनिवडणुकीत पुनरावृत्ती झाली तर पुन्हा कारवाई वरिष्ठाकडून होणार का? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.