मुंबई – एकीकडे हिवाळी अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील शिंदे फडणवीस यांच्यावर थेट दिल्लीतून निशाणा साधताना दिसत आहेत. दिल्लीत गृहमंत्र्यांसमोर जे ठरलं ते मानायला सध्या बोम्मई तयार नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात आग लावण्याचं काम सध्या बोम्मई करताहेत असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
आज खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सध्या सुरु असलेल्या विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले,”कर्नाटकाने जो निषेध ठराव केला त्याचपद्धतीने महाराष्ट्र सरकराने देखील ठराव मंजूर करावा. ते माझ्यासह जयंत पाटलांवर खटला दाखल करू पाहत आहेत. तुम्ही माझ्यावर काय खटला दाखल करता ? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर खटले दाखल करा” असं आव्हानच संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना आईवेळी दिल.
महाराष्ट्र कर्नाटक वाद आता चांगलाच चिघळू लागला आहे. कर्नाटक सरकारने याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत आक्रमक भूमिका का घेत नाहीत असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अधिवेशनापूर्वी उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आजच्या अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत काही ठोस पावले उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.