नवी दिल्ली – राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या बिहार राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचनाही जारी झाली आहे. या पार्श्वभूमीवर तेथे सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्या राजकीयदृष्ट्या औत्सुक्याच्या आहेत.
या निवडणुकांमध्ये लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची छायाचित्रे पोस्टरवरुन गायब झाल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी खोचक सवाल विचारला आहे.
काय म्हणाले रविशंकर प्रसाद
लालू आणि राबडी यांनी साडेसात वर्षे बिहारवर राज्य केले. त्यांची छायाचित्रे न वापरण्यामागील कारण काय आहे? त्या दोघांची छायाचित्रे वापरल्यास बिहारमधील अपहरण, लूट, खंडणीची प्रकरणे पुन्हा जनतेच्या डोळ्यासमोर येतील, अशी भीती तेजस्वींना वाटत आहे. सध्या विरोधी पक्षनेते प्रचार करताना दिसत आहेत. परंतु, त्यांच्या आई-वडिलांची छायाचित्रे प्रचारातून गायब आहेत.
दरम्यान, आरजेडीच्या पोस्टरवरुन लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी हे गायब झालेले दिसत आहेत. यावरुन प्रसाद यांनी थेट तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.