नवी दिल्ली – केंद्र सरकारने कृषी कायद्यांना या आधीच स्थगिती दिली आहे, असे असताना आता या कायद्याच्या विरोधात तुम्ही कशासाठी आंदोलन करीत आहात असा सवाल सुप्रिम कोर्टाने आज आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींकडे उपस्थित केला.
आज झालेल्या सुनावणीच्यावेळी केंद्र सरकारचे वकिल के. के वेणुगोपाल यांनी सांगितले की, आंदोलन हिंसक बनत असून काल लखीमपूरखेरी येथील हिंसक प्रकारात आठ जण ठार झाले आहेत. मुळात देशाच्या सर्वोच्च न्यायालयात कृषी कायद्याच्या संबंधात सुनावणी सुरू असताना या प्रकरणात आंदोलन करण्याची गरजच नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.
शेतकरी आंदोलकांनी आपल्याला जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची अनुमती मिळावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. त्यावेळी कोर्टाने आंदोलनकर्त्यांना हा सवाल केला. जंतर मंतर येथे किमान दोनशे शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची अनुमती दिली जावी, अशी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
आम्ही तेथे शांततापूर्वक आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करणार आहोत असेही आंदोलनकर्त्यांनी कोर्टापुढे स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.