श्रीगोंदा – विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. 24 तास सुद्धा उलटत नाही, तोच विजयाचे दावे-प्रतिदावे व कोणाला किती मताधिक्य मिळेल, याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचे चित्र श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.
येथील निवडणुकीसाठी 11 उमेदवार मैदानात होते. बबनराव पाचपुते (भाजप) विरुद्ध घनश्याम शेलार (राष्ट्रवादी) अशी लढत येथे पाहण्यास मिळाली. संभाजी ब्रिगेडचे टिळक भोस यांनी देखील लोकांसमोर तिसरा पर्याय ठेवत राजकीय मैदानात हिरीरिने सहभाग नोंदविला.
सुरवातीला पाचपुते यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी निवडणून शरद पवार यांच्या सभेनंतर ‘कांटे की टक्कर’ बनली. पवारांची ही सभा राष्ट्रवादी व आघाडीसाठी राजकीय टॉनिक ठरली. शेलार यांची उमेदवारी निश्चित झाल्यापासून पाचपुते गट गफिल होता. मात्र पवारांच्या सभेनंतर त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली. त्यामुळे एकतर्फी वाटणारी ही निवडणूक दोन्हीकडे आळीपाळीने झुकली, तर टिळक भोस यांनी शेलार व पाचपुतेंवर सडकून टीका करत, समाज कार्याची संधी मागत मैदान गाजवले. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने अधिकृत आकडेवारी मंगळवारी सकाळी निवडणूक शाखेने दिली. सहायक निवडणूक निर्णयाधिकारी महेंद्र माळी यांनी दिलेल्या माहिती नुसार 67.66 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली.
गुलाल उधळणारच…
झालेले मतदान पाहता शेलार समर्थक व राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संजय आनंदकर म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी महाराष्ट्रात असलेले वातावरण व घनश्याम शेलार यांनी केलेल्या निस्वार्थी समाजकार्यामुळे कौल आमच्या पाठीशी असेल. गुलाल आम्हीच उडवणार, तर बबनराव पाचपुते यांचे निवडणूक प्रतिनिधी प्रा. तुकाराम दरेकर म्हणाले, पाचपुते यांचा विजय निश्चित ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. झालेले मतदान पाहता 40 ते 54 हजारांदरम्यान आमचं मताधिक्य असेल.