डॉ. अमोल कोल्हेंचा सवाल : बुरुज ढासळला तरी मावळे बालेकिल्ला अबाधित ठेवणार
सातारा – कालपर्यंत तुमच्यापुढे मावळ्यांच्या नजरा आदराने झुकत होत्या. मात्र, आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात, तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरे कशी देणार, असा सवाल खा. अमोल कोल्हे यांनी केला. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यातील एखादा बुरुज ढासळला तरी मावळे हा बालेकिल्ला अबाधित ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीने काढलेली शिवस्वराज्य यात्रा बुधवारी साताऱ्यात आली होती. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष अमोल मेटकरी, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप विधाते, वनिता गोरे, मधू कांबळे, सतीश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा.कोल्हे म्हणाले, ज्या सरकारने बेरोजगारी वाढविली, 72 हजार मेगा भरतीच्या घोषणेची अंमलबजावणी केली नाही, शिक्षक भरती रखडवून विद्यार्थ्यांचे वाटोळे केले, पाच वर्षात अडीच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडविल्या, त्या भाजपच्या नेत्यांसोबत राजे तुम्ही मांडीला मांडी लावून बसणार आहात का? इतिहासात राजाच्या विना 18 वर्ष रयतेने लढा दिला होता. त्यामुळे बुरुज ढासळले तरी मावळे आपल्या छातीचा कोट करून बालेकिल्ला अबाधित ठेवतील. सद्य स्थितीत शिवपूर्वकाळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वतनदार सैन्याला गृहीत धरून मोगलांची वतनदारी करत आहेत. मात्र, काळ बदलला आहे. आम्हाला गृहीत धरू नका, असे सैन्याने वतनदारांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
राजकीय पक्षांना समुद्राप्रमाणे भरती-ओहोटी येत असते. राष्ट्रवादी सत्तेत नसल्याने अनेक जणांनी भाजपच्या समुद्रात इमले बांधले आहेत. मात्र, उद्या राष्ट्रवादीच्या समुद्राला पुन्हा भरती येईल तेव्हा पक्ष सोडून जाणाऱ्यांचे इमले नेस्तनाबूत होतील. विधानसभा निवडणूक जवळ येईल तसे भाजप दिशाभूल करण्याचे मेसेज पाठवत राहील; परंतु त्यावेळी केवळ रोजगार, शिक्षण, कर्जमापीचे, पीक विम्याचे काय झाले, एवढेच प्रश्न प्रत्येकाने विचारणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री आज महाजनादेश यात्रा काढत आहेत. वास्तविक त्यांनी विकासकामे केली असती तर त्यांना अशी यात्रा काढावी लागली नसती. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. मात्र, अद्याप एक वीटही त्यांना रचता आली नाही. राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत आज महाराजांचा भगवा झेंडा लावला तर शिवसेनेचे लोक प्रश्न विचारत आहेत. त्यांना आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला नाव देण्याचा विषय पुढे आला, तेव्हा खा. शरद पवार यांनी राजा शिवछत्रपती असे नाव सुचिवले होते, हे विसरता कामा नये, असे खा. कोल्हे यांनी सांगितले.
आ. जयंत पाटील म्हणाले, साताऱ्यात असे कसे पळपुटे निघाले? माझ्यादेखील पाचपैकी एका कारखान्याची जमीन सरकारने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु मी लाचारी पत्करली नाही. कारण पाच पैकी एक कारखाना गेला तरी चार शिल्लक आहेत. राहिला प्रश्न एका कारखान्याचा, तो विषय न्यायालयात मार्गी लागेल. शिवेंद्रराजे मंत्रिपदासाठी भाजपमध्ये गेले आहेत; परंतु पुन्हा भाजप सत्तेत आला तर दिल्लीतून आदेश येईल की, जे नव्याने पक्षात आले आहेत त्यांची पक्षनिष्ठा तपासा आणि मगच निर्णय घ्या. पक्षातून काही जण जात असले तरी पवारसाहेब म्हणजे राजकीय विद्यापीठ आहे. येथे एक गेला तरी अनेक मातब्बर उमेदवार आपल्याकडे आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.
आ. शिंदेंचा कंठ दाटून आला
सभास्थानी खा. अमोल कोल्हे व आ. शशिकांत शिंदे यांचे आगमन होताच उपस्थित जनसमुदायाने जल्लोष केला. युवकांच्या घोषणा थांबायचे नाव घेत नव्हत्या. अखेर आ. शिंदे यांनी माईक हातात घेत युवकांना निवडणुकीपर्यंत उत्साह कायम ठेवण्याचा सल्ला दिला. एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता एवढा जनसुमदाय उपस्थित राहील, याचा अंदाज नव्हता. साताऱ्याचा बालेकिल्ला ढासळतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता उपस्थिती आणि उत्साह पाहता कोणी कितीही धडका मारू द्या, हा जिल्हा पवारसाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा असल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राहणार, हे निश्चित झाल्याचे सांगताना आ. शिंदे यांचा कंठ दाटून आला होता.
मेळाव्याकडे उदयनराजे, रामराजे यांची पाठ
शिवस्वराज्य यात्रेला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर उपस्थित राहणार का, याची उत्सुकता होती. मात्र, दोघांनीही या यात्रेकडे पाठ फिरवल्याने हे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. शिवेंद्रराजेंनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर उदयनराजे त्याच वाटेवर असल्याचे बोलले जात असल्याने “छत्रपतींविना शिवस्वराज्य’ असेच राष्ट्रवादीच्या यात्रेचे वर्णन करावे लागेल.
पक्ष सोडून जाणाऱ्यांना श्रध्दांजली
ज्यांना पवारसाहेबांनी, पक्षाने भरभरून दिले, ज्यांची स्वत:ची काही ओळख नव्हती, वलय नव्हते, त्यांना पवारसाहेबांनी मोठी पदे दिली. तेच लोक आज पडत्या काळात पक्ष सोडून जात आहेत. त्यांना मी श्रध्दांजली अर्पण करते, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी टीका केली.