महाराष्ट्राच्या राजकारणावर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : राज्यातील राजकीय घडामोडींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. देशभरातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील भाजप आणि राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ज्याचा राज्यपाल त्याचेच सरकार अशी परिस्थिती आता निर्माण झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
दुसरीकडे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेना हा गुंडांचा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोश्यारी यांनी अनैतिक काम केल्याचे ते म्हणाले. राज्यपालांनी मिलीभगत करुन देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांची खातरजमा न करता शपथ दिली. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आपल्या पदावर राहण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केले. शिवसेना कोणाच्या जीवावर इतकी उत्तेजित कशी झाली होती, असा सवाल करत हा निकाल भाजपचा नैतिक आणि राजकीय विजय असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेने छत्रपतींची भाषा बोलू नये असेही ते म्हणाले.