कंत्राटदारांचीच ढेरी फुगण्याची शक्यता : कष्टकरी उपाशीच राहणार?
नगर – गरीब,मजूर व सर्वसामान्य जनतेला 30 ग्रॅमच्या दोन चपत्या, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम वरण आणि 150 ग्रॅम भात असलेली शिवभोजन थाळी महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात येणार आहे. नगर शहराच्या पाच केंद्रावर रोज 700 लोकांनाच जेवण मिळणार आहे.
मात्र शिवभोजन थाळी मिळविण्यासाठी तुम्हाला दुपारी 12 ते 2 ही दोन तासांची वेळ गाठण्याची कसरत करावी लागणार असून,एका ठिकाणी केवळ 75 किंवा 150 व्यक्तींनाच जेवण मिळणार आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला यासाठी संबंधीत भोजनालयाच्या मालकाला मोबाईलवर छायाचित्र देखील द्यावे लागणार आहे. तुटपुंज्या शिवभोजनामुळे गरीब-कष्टकऱ्यांचे पोट भरणार तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एका थाळीचे ग्राहकाकडून केंद्रचालकाला केवळ दहा रूपये घ्यायचे असले तरी त्याला राज्य शासन थाळीमागे चाळीस रूपये एवढे अुनदान देणार आहे. म्हणजे तो 50 रूपयाची थाही विकणार आहे. व या 50 रूपयाच्या बदल्यात तो केवळ 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम वरण, 150 ग्रॅम भात व 30 ग्रॅमच्या दोन चपात्या देणार आहे. एवढ्यात त्या गरीब,मजुर ग्राहकाचे पोट कसे भरणार हा प्रश्न निर्माण होत असला तरी या 50 रूपयात केंद्रचालकाचे पोट मात्र चांगलेच फु गणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात गरीब जनतेला दहा रूपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर दहा रूपयांमध्ये भोजन उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेवरचा दबाव वाढला.
अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या एका शहरात प्रायोगिक तत्वावर शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु, गरीब व मजुरांना दहा रूपयांमध्ये थाळी उपलब्ध करून देताना प्रचंड अटी घातल्या आहेत. यामध्ये शिवभोजन केंद्रावर केवळ दुपारी 12 ते 2 याच वेळात जेवण उपलब्ध होइल.
बाहेरचे खाद्यपदार्थ या केंद्रास घेवून येण्यास व केंद्रातून जास्तीचे जेवण घेण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. एवढेच नाही तर तर,जास्त भूक लागली असेल, तर जास्तीची चपाती,भाजी,वरण अथवा भातदेखील केंद्राच्या व्यक्तीस देण्यात बंदी घातली आहे.तसेच प्रत्येक केंद्रावर प्रथम येणाऱ्या 75 अथवा 150 व्यक्तींनाच हे शिवभोजन देण्यात येणार आहे.
या अटी कमी म्हणून की काय योजनेचा कुणी गैरफ ायदा घेऊ नये म्हणून,शिवभोजन घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपले छायाचित्र व मोबाईल क्रमाकांची नोंद करणे बंधनकारक केले जाईल. तर, सरकारी कर्मचारी आणि संबंधीत केंद्रातील व्यक्तींना या भोजनाचा लाभ घेता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. जनतेला घातलेल्या अटीसोबतच केंद्रचालकांना देखील अनेक जाचक अटी घातल्या आहेत.