कबीर बोबडे
नगर – तरुण नवशिक्या बाईक चालकांनी शहरात सर्वत्र उच्छाद मांडलेला आहे. भरधाव वेगाने बाईक चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत. भर दिवसा तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यांचा बाईकर्स सुसाट वेगात वेडीवाकडे वळणे घेत भरघाव वेगाने वाहने चालवतात त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या आणि इतर वाहनचालकांची पंचाईत होते आहे. आपल्या भरघाव गाडीचा वेग कोणाच्या तरी जिवावर उठतोय, याचे जराही भान या दुचाकीस्वारांना नसल्याचे दिसते.
प्राप्त माहितीनुसार, जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या एकून 650 च्या आसपास कारवाया केल्या. त्यात भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांविरूध्द 122 कारवाया केल्या असून 1 लाख 50 हजार 200 रूपये इतका दंड वसूल केला आहे. तर म्युझिकल हॉर्न, कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या दुचाकी चालकांवर 29 कारवाया केल्या असून 4 हजार रूपये एवढा दंड वसूल केला. तर बाईकर्सला चाप बसावा म्हणून 8 गुन्ह्यांची नोंद देखिल करण्यात आली. एवढी सगळी करूनही बाईकर्सला अजूनही लगाम लागला नाही, हे चित्र आहे.
वेडीवाकडी वळणे घेत बेफिकीरपणे बाईक चालवल्या जाणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे लहान मुले, तसेच वृद्धांना जीव मुठीत घेवून चालत जावे लागत आहे. वाहतूक शाखे कडून अधूनमधून वाहनांची तपासणी होत असते. मात्र, त्यावेळी हे युवक रस्त्यावर धुमाकूळ घालत नाहीत. तपासणी मोहीम थंडावली की यांच्या गाड्यांना पुन्हा वेग येत असल्याचे पहायला मिळते.
अनेकदा दोन-तीन वाहनांना धडक देऊन हे निघून जातात. ठोस कारवाई होत नसल्यामुळे या बाईकर्सचे चांगलेच फावत आहे. या बाईकर्सला दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा तर नाहीच नाही पण ते स्वत:च्या मरणाची देखिल भीती त्यांना वाटत नाही. त्यामुळे ते हेल्मेट देखिल घालत नाहीत.
बाइकर्सच्या गाड्यांचे नंबर्स देखील विचित्र पध्दतीने लिहिलेली असतात. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचे नंबर्स नीट वाचता येत नाहीत. त्यांच्या बाईकवर लिहिलेले नंबर कुणीही वाचू शकणे कठीण आहे. शिवाय ते भरघाव वेगाने वाहने चावलवत असल्यामुळे त्यांच्या वाहनाची गती खूप असते. त्यामुळे त्यांचे गाडीचे नंबर्स कुणाला दिसत नाहीत. याशिवाय बऱ्याच बुलेट गाड्यांना इंदोरी ढोलकी, आणि पंजाबी फटका अशी नावे असलेली कर्कश आवाजीची सायलेन्सर सर्रास बसवली जातात.
हे बाईकर्स विनाकारण गाडीचा हॉर्न मोठ्याने वाजवतात. त्यामुळे हकनाक इतरांना त्रास होतो व बऱ्याच दुचाकीस्वारांकडे गाडीचे कागदपत्र इन्शुरन्स, चालक परवाना नसतानासुद्धा गाडी चालवली जाते. असे असतांनासुद्धा वाहतूक पोलिस विभागातर्फे शहरातील दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई होत नसल्याने शहरात वाहतूक शिस्त उरली नाही, असे नागरिकांमधून बोलल्या जाते.
यामुळे शहरात अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा गैरफायदा उठवत सध्या शहरात हुल्लडबाजी करत बाईक चालविल्या जाताहेत. त्यांच्या स्टंटबाजीमुळे दुर्घटनेची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी बेफाम दुचाकीस्वारांची लायसन्स तपासावीत व बाईकर्सवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सुरक्षित वाहतूक उपलब्ध द्यावी
महागड्या किमतीच्या या तरूण बाईकर्सच्या बाईक आहेत. कुणाच्याही जिवाची पर्वा न करता हे तरूण बाईक चालवतात. त्यामुळे हे बिघडलेले तरुण कुण्या मोठ्या बापाचेच असतील. रस्त्यावरील सामान्य नागरिक बाईकर्सच्या हूल्लडबाजीमुळे अपघातात जखमी झाली तरी चालेल पण पोलीस प्रशासनाला काय फरक पडतो. परंतु शहरातील सामान्य नागरिकांना सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. तर कायदा व सुव्यवस्थेचा राखणे हे पोलीस विभागाचे कर्तव्य आहे. मोटर वाहतूक कलम 180 नुसार अल्पवयीन मुलाला बाईक चालवायला दिल्यास 1 हजार रुपये दंड आणि 3 महिनेची सजा आहे.
शहर वाहतूक शाखेने वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर सतत कारवाया केल्या. मात्र, बाईकर्सला चाप बसला नाही. त्यांच्या मानसिकतेत जराही बदल दिसत नाही. यात केवळ मुलेच आहेत असं नाही, तर मुलींची संख्याही जास्त आहे. वाहतूक शाखा योग्य ती कारवाई करतच आहे. पण आम्ही आवाहन करतो की, वाहतूक नियम पाळा, सिग्नल तोडू नका. इतरांच्या जीवाशी खेळू नका. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.
अविनाश मोरे पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा